लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबिन बियाणे उगवण तपासणीची सोपी पद्धत कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवणक्षमता घरच्या घरी तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.घरच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मुठभर सोयाबिन बाहेर काढावे, सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करुण घेत गोणपाटाचे सहा चौकांनी तुकडे स्वच्छ धुवून जमिनीवर पसरवा आणि काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेमी अंतरावर ओळीत ठेवून तीन नमुने तयार करावे, बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरुण पुन्हा चांगले पाणी टाका. त्याची गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवा आणि अधूनमधून पाणी शिंपडून ओले ठेवा. सहा- ते सात दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरुन उघडा. तिन्ही गुंडाळीतील ७० वा त्यापेक्षा जास्त दाण्याला कोंब असल्यास हे बियाणे दर्जेदार आहे. १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम रायझोबीयम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करुन वाळवावे. पेरणीपूर्वी प्रती तीन किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशीपासून संरक्षणासाठी प्रक्रिया करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अशी करा पेरणीउगवण झालेल्या बियाण्यांची टक्केवारी ७० पेक्षा कमी असल्यास एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. ७० टक्क्यांपेक्षा कमी बियाणे उगवले असेल, तर त्या प्रमाणात बियाण्यांची मात्र जास्त वाढविल्यास बाजारातील बियाण्याऐवढीच रोपाची संख्या राहून अपेक्षित उत्पादन येते. ७० टक्के व त्यापेक्षा जास्त उगवण शक्ती असल्यास एकरी ३० किलो बियाणे वापरावे. ६५ ते ६९ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३२.५ किलो बियाणे वापरावे. ६० ते ६४ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३५ किलो बियाणे वापरावे. ५० टक्के पेक्षा कमी उगवण असल्यास घरचे बियाणे न वापरता प्रमाणित बियाणे खरेदी करावे.
शेतकऱ्यांनो, घरातच तपासा बियाण्यांची उगवणशक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST