लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीईअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेशासाठीच्या राखीव २५ टक्के कोट्यासाठी सन २०२५-२०२६ या शैक्षणिक सत्रासाठी राज्यभरात एक लाख एक हजार ९६७ विद्यार्थ्यांची निवड केली. मात्र, त्यापैकी केवळ ६९ हजार ४२० बालकांचाच आतापर्यंत प्रवेश झाला आहे.
परिणामी, शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असतानाही तब्बल ३९ हजार ६८२ जागा राज्यात शिल्लक असल्याचे वास्तव आहे. आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. सन २०२५-२०२६ या सत्रासाठी आठ हजार ८६३ शाळांची नोंदणी झाली. यात एक लाख ९ हजार १०२ जागा रिक्त आहेत. त्यासाठी तीन लाख ५ हजार १५१ जणांनी अर्ज केले. त्यापैकी एक लाख १ हजार ९६७ जणांची प्रवेश फेरीतून निवड झाली. मात्र, आतापर्यंत केवळ ६९ हजार ४२० जणांचाच प्रवेश झाला आहे, तर ३९ हजार ६८२ जागा रिक्त राहणार आहेत.
विदर्भातील प्रवेश झालेली स्थितीअमरावती १०६७, अकोला १४०१, यवतमाळ १२५३, बुलढाणा २०६७, वाशिम ६८५, नागपूर ४५७६, भंडारा ६०९, गोंदिया ७५१, चंद्रपूर १०७२, गडचिरोली ३०७, वर्धा २१६
प्रवेशाकडे का फिरवत आहेत पाठ ?जिल्ह्यात वा शहरात ज्या नामांकित शाळा आहेत. त्यापैकी काही शाळा या आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवत नाही. अनेकांना आपल्या मर्जीतील शाळा मिळत नाही. त्यामुळे अनेक जण प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवत आहेत.
दरवर्षीच जागा राहतात रिक्तनामांकित शाळेतील शिक्षण महागडे झाले असल्याची पालकांची ओरड असली तरीही दरवर्षीच अनेक जणांची निवड झाली असतानाही प्रवेश घेत नाही. त्यामुळे २५ हजारांच्या आसपास जागा रिक्त राहत असल्याचे चित्र दरवर्षीच दिसून येते.