चंद्रपूर : मे-जून महिना शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांचा समजला जातो. बहुतांश कर्मचार्यांच्या बदल्या याच महिन्यात होते. यावर्षीही त्या होणार होत्या. मात्र प्रथम लोकसभा आणि त्यानंतर आता शिक्षक आमदाराच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्याने बदलीसत्र सध्या स्थगित झाले आहे. त्यामुळे बदलीपात्र काही कर्मचार्यांनी केलेले तडजोडीचे नियोजन आता बिघडले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर जिल्हा परिषद, तसेच अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांचा बदल्यांचे सत्र सुरु झाले होते. जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या तसेच अन्य कर्मचार्यांच्या बदल्यांचे वेळापत्रतही ठरवून दिले होते. प्रथम समुपदेशनाद्वारे बदल्यांसाठी कर्मचार्यांना बोलाविण्यात आले होते. या बदल्यांमुळे अनेकांचा मनस्ताप वाढला असतानाही काही कर्मचार्यांनी आनंद सुद्धा व्यक्त केला. मागील काही वर्षांपासून नक्षलग्रस्त भागात काम करणार्या कर्मचार्यांना त्यांच्या पसंतीच्या गावात बदलीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र काही कर्मचारी वगळता नक्षलग्रस्त भागातून इतरत्र जाण्याच्या कर्मचारी मनस्थितीत नाही. आपसी बदली, विनंती बदली करणार्या कर्मचार्यांनी अनेक तडजोडी केल्या आहेत. मात्र त्यांच्या तडजोडी सध्या हवेत गेल्या आहे. अनेकांनी मागील सहा महिन्यांपासून बदलीसाठी ‘फिल्डींग’ लावून ठेवली होती. काहींनी पती-पत्नी एकत्रीकरणासाठी तर काही जिल्हा बदलीसाठीही आपले अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दिले होते. मात्र आचारसंहितेमुळे बदल्यांवर स्थगिती आल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक तसेच अन्य कर्मचारी शहरात राहून ग्रामीण भागात आपली सेवा बजावतात. त्यामुळे ते रस्त्यावरील आणि वाहन जाणार्या गावांना पसंती देतात. यासाठी बदली होण्याच्या काही महिन्यांपासून तडजोडीच्या प्रयत्नात असलेल्या कर्मचार्यांना आचारसंहितेमुळे चांगलाच धक्का बसला. (नगर प्रतिनिधी)
आचारसंहितेमुळे कर्मचार्यांचे नियोजन बिघडले
By admin | Updated: May 27, 2014 23:36 IST