कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील महावितरणने थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे थकबाकीदारांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बिल न भरणाऱ्या १५ जणांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे.
कोरोना काळात अनेक ग्राहकांचे वीज बिल थकीत होते. अनेकांना हाताला काम नसल्यामुळे त्यांना ते बिल भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जे आता थकबाकीदार आहे. त्यांची कसल्याही प्रकारे गय न करता वसुलीचा सपाटा महावितरण सुरू केलेला आहे. कारण महावितरण तोट्यात जात आहे. त्यामुळे कोठारी येथील १५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. अनेक विरोधी पक्षांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लोकांना रोजगार नसल्याने वीज बिल भरणे शक्य नाही, त्यामुळे वीज बिल माफ करावे, यासाठी अनेकदा आंदोलन केले; परंतु सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे आता कसेही करा पण वीज बिल भरा, असा तगादा महावितरण लावत आहे.
महावितरणने सवलत द्यावी व जर सवलत न दिल्यास वीज खंडित करायला आल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे कार्यकर्ते शंकर भटरकार यांनी दिला आहे.