प्रवीण खिरटकर - वरोरासततच्या नापिकीने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सध्या तरी शेती व्यवसाय हवामानाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. असे असतानाही एका शेतकऱ्याने रेशीम उत्पादनाची शेती करीत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आणि त्यातून चांगला नफा मिळविला. रेशीम शेती आपल्या परिसरात घेऊन भरघोस उत्पादन घेण्याची किमया करीत या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. धानोली येथील राहुल विधाते व प्रसाद विधाते या दोघा भावंडांनी त्यांच्या शेतात अनेकविध प्रयोग केले आहेत. त्यात कुक्कुटपालन, फळबाग, प्रायोगिक तत्वावर मका उत्पादन, वन शेतीचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच त्यांनी एका एकरात रेशीमचे उत्पादन घेतले. त्यासाठी शेतात टिनाचे एक शेड उभारले. वर्धा जिल्ह्यातून तुतीच्या कलमा आणून एक एकरात त्या लावण्यात आल्या. ७५ ते ९० दिवसांत या कलमांचे आता झाडात रुपांतर होवून त्याला मोठ्या प्रमाणात पालव्या फुटल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातून रेशीम किड्यांची अंडी आणली. ती अंडी तुतीचे पाणे तोडून त्यात ठेवल्या जातात. त्यानंतर अंडीमधून अळ्या बाहेर येतात. त्या अळ्यांना तुतीची कोवळी पाने खाण्यासाठी देण्यात येतात. कोवळी पाने १४ दिवसांपर्यंत दिल्यानंतर या अळ्यांना एक दिवस उपाशी ठेवण्यात येते. त्या अळ्या २१ दिवसांत कोश तयार करतात. हा कोश दोन दिवसांत विक्रीसाठी घेवून जावे लागते. कोशामधून अंडी बाहेर गेल्यास कोशाचे वजन घटते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. वर्षभरातून तीनवेळा उत्पादन मिळते. एका एकरात एक क्विंटल कोश तयार होतो. यामध्ये अंडी व तुतीच्या कलमांची किंमत अत्यल्प आहे. फक्त प्रक्रिया करण्यासाठी टिनाचे शेड एकदा उभारावे लागते. त्यासाठीच खर्च येतो. उत्पादन खर्च अत्यल्प असल्याने मोठ्या प्रमाणात रेशीमच्या उत्पादनातून नफा होत असतो. मोठ्या प्रमाणात उत्पादन राहिल्यास व्यापारी स्वत: शेतावर येवून खरेदी करीत असतात. महाराष्ट्रात १७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात रेशीमला कमी भाव आहे. अशी खंत प्रसाद विधाते यांनी व्यक्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
रेशीम उत्पादनातून साधली आर्थिक उन्नती
By admin | Updated: June 29, 2014 23:50 IST