संचारबंदीच्या काळात साडेतेवीस हजार पॉझिटिव्ह, १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:29 AM2021-05-07T04:29:42+5:302021-05-07T04:29:42+5:30
चंद्रपूर : वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी राज्य शासनातर्फे १५ एप्रिलपासून संचारबंदी करण्यात आली. मात्र, याही कालावधीत कोरोना रुग्णांमध्ये ...
चंद्रपूर : वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी राज्य शासनातर्फे १५ एप्रिलपासून संचारबंदी करण्यात आली. मात्र, याही कालावधीत कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दिनांक १५ एप्रिल ते १ मे या दरम्यान जिल्ह्यात ६४ हजार ९३४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २३ हजार ५२० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर याच कालावधीत १४ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या कालावधीत रुग्णांच्या मृत्यूंमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केेले होते. दरम्यान, राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी जाहीर केली. केवळ सकाळी ७ ते ११ या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. याव्यतिरिक्त सर्वच प्रतिष्ठाने व दुकाने बंद आहेत. परंतु, तरीसुद्धा रुग्णसंख्येत घसरण झाली नाही. १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत २३ हजार ५२० बाधित रुग्ण आढळून आले. दरम्यान, ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ३८ हजार ६९० चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ८,९९६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३,५१० जण कोरोनामुक्त झाले.
बॉक्स
या कारणामुळे वाढली रुग्णसंख्या
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. संचारबंदी करण्यात आली असूनही अद्यापही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. बाजारपेठेत गर्दी करत आहेत.
संचारबंदीच्या काळात चाचण्या वाढविण्यात आल्या. ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ३८,६९० चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ८ हजार ९९६ बाधित आढळून आले तर १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत ६४ हजार ९३४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २३ हजार ५२० बाधित आढळून आले.
बॉक्स
बेफिकिरीने वाढले ग्रामीण भागात रुग्ण
चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातील रुग्णसंख्याही प्रचंड वाढत आहे. ४ मेपर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या ६५ हजार ३८ बाधितांपैकी शहरी भागात २४,४५० रुग्णसंख्या ग्रामीण भागात आढळून आली. अद्यापही ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. ते बेफिकिरीने वागत आहेत. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर आदींकडे दुर्लक्ष करतात. अद्यापही ग्रामीण भागात विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम होत आहेत.