परंपरा जोपसण्याची गरज : नव्या पिढीला घाणमाकडच ठाऊक नाहीघनश्याम नवघडे नागभीडहोळी आली की गावात दिसणाऱ्या घाणमाकडी आता दिसेनाशा झाल्या आहेत. आजच्या पिढीला एखाद्या चित्रामध्येच या घानमाकडीचे दर्शन घडत आहे.साधारणत: ३० ते ३५ वर्षा अगोदर घाणमाकडही खेड्यातील मुलांचे मनोरंजनाचे प्रमुख साधने होती. उन्ह्याळ्यात मुलांना अभ्यासाचे टेंशन नसते, बहुतेक वेळ फावला असतो. त्याकाळी टी.व्ही. मोबाईल आजच्यासारखे नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परंपरागत खेळांमधूनच मनोरंजन करावा लागत असे.पण आता काळ बदलला आणि काळाबरोबर मनोरंजनाच्या व्याख्यासुद्धा बदलल्या. परंपरागत खेळणी तसेच मनोरंजनाची साधने कालबाह्य झाली. त्यांची जागा आता टीव्ही, मोबाईल यासारख्या आधुनिक साधनांनी घेतली आहे. याचाच परिणाम म्हणून होळीनंतर प्रत्येक खेड्यात दिसणारी घानमाकड आता कालबाह्य नाही तर दिसेनाशी झाली आहे.उन्ह्याळ्याची चाहूल लागताच गावातील काही प्रमुख ‘पोरं’ एकत्र यायची. जंगलात किंवा शेतात जावून धनुष्य बाणाच्या आकाराचा लाकुड आणायचे. मधोमध त्याला एक छिद्र पाडायचे आणि गाातील चौकात एक खांब गाडून त्यावर ही घानमाकड लावायची. दिवसा एखाद्या झाडाखाली तर रात्री एखाद्या चौकात या घानमाकडींचा आवाज सुरूच असायचा. दोन बाजुला दोघे बसले की, आळीपाळीने दोघे झोके द्यायचे आणि त्यांना दम भरेपर्यंत हे झोके सुरूच राहचे. दम भरल्यानंतर ते उतरायचे आणि नंतर दुसरे चढायचे. काही टारगट मुले आजुबाजूच्यांना त्रास व्हावा म्हणून कर्कश आवाज करण्यासाठी घानमाकडीच्या छिद्रामध्ये मुद्दाम सागरगोट्या किंवा वाघनख टाकायचे.पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये गुरांची बैठक शेतातील एखाद्या आंबराईत किंवा एखाद्या मोठ्या झाडात असायची. गुरांनी बैठक घेतली की गुराखी हटकून घानमाकडीचा खेळ खेळायचे. पण आता तेव्हढी गुरेही राहिली नाहीत आणि घानमाकडीचा खेळही उरला नाही.आजच्या पिढीला घानमाकड हा शब्द विचित्र वाटेल. पण घानमाकडीवर झोके घेण्यात जो आनंद व्हायचा, तो अवर्णनीय होता. मी हा अनुभव घेतला आहे. पण आज घानमाकड कुठेच दिसत नाही.- प्रा. डॉ. अनिल कोरपेनवार
खेड्यापाड्यातील घाणमाकड झाल्या लुप्त !
By admin | Updated: March 13, 2016 01:06 IST