शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या तारखेत घोडचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 00:37 IST2016-04-17T00:37:38+5:302016-04-17T00:37:38+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

Due to the farmers' suicides | शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या तारखेत घोडचूक

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या तारखेत घोडचूक

जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रताप : आत्महत्या तपासणीतील वास्तव
अनेकश्वर मेश्राम  बल्लारपूर
चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सततची नापिकी व कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपवित आहे. शासनस्तरावरुन मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा निपटारा जिल्हाधिकारी कार्यालयाने २१ मार्चला जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या माध्यमातून केला. यामध्ये एका शेतकऱ्याच्या मंजुर प्रकरणात व एकाच्या नामंजुर प्रकरणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या तारखेत मोठी घोडचूक केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतापामुळे प्रशासनातील गलथानपणा उघड झाला आहे.
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सदर प्रकरणावर स्वाक्षरी करुन त्याच्या प्रतिलिपी विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी सिंदेवाही, वरोरा व गोंडपिपरी यांना ३१ मार्च रोजी पाठविले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील मृत शेतकरी तेजराज विठोबा बोरकर (४७ यांनी २४ डिसेंबर २०१६ रोजी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्र क्रमांक कावि/ अका/ टंचाई/२०१६/२२९ दिनांक ३१ मार्च २०१६ च्या पत्रात स्पष्ट नमुद केले आहे. या आत्महत्या प्रकरणाला २१ मार्चच्या तपासणी समितीच्या सभेत पात्र ठरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रताप इथेच थांबला नाही. गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरुर येथील शेतकरी तिरुपती सुरेश चाफले (२३) यांनी किटकनाशक द्रव्य प्राशन करुन ३० सप्टेंबर २०१६ रोजी आत्महत्या केल्याचे दर्शविण्यात आले आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रकरणाला मंजुरी देण्यासाठी जिल्हास्तरीय तपासणी समिती समोर ठेवल्या जाते. मात्र तपासणी समितीच्या एकाही सदस्याच्या लक्षात सदर प्रकार का आला नाही, हे न समजणारे कोडे आहे. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर सदर प्रकरण संबंधित विभागाकडे स्वत:ची स्वाक्षरी करुन रवानाही करतात.
यावरुन जिल्हा प्रशासन कामकाजासंदर्भात किती दक्षता बाळगते, हे दिसून येते. विशेष म्हणजे २१ मार्च रोजी शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांचे प्रस्ताव समिती समोर ठेवण्यात आले होते.
गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरुर येथील शेतकरी तिरुपती सुरेश चाफले यांच्या नावाने शेती नाही व कर्ज देखील नसल्याचे नमूद करुन अपात्र करण्यात आले आहे. मात्र त्याच्या मृत्युची तारीख ३० सप्टेंबर २०१६ अशी पत्र क्रमांक कावि/ अका/ टंचाई/२०१६/२२६ दिनांक ३१ मार्च २०१६ च्या पत्रात जिल्हाधिकारी कार्यालयाने दर्शविली आहे.
जिल्हा प्रशासनातील गलथानपणाचा कळस थांबविण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रीया शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत. जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणांपैकी याच तारखेच्या सभेत १२ प्रकरणांना पात्र तर ८ प्रकरणाला अपात्र ठरविण्यात आले आहे. अपात्र प्रकरणात एकत्र महिला वृद्ध शेतकऱ्यांचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या
शेतकरी आत्महत्या विदर्भात वाढल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यापाठोपाठ आजघडीला चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी कर्ज व नापिकीला कंटाळून जीवनयात्रा संपवित आहेत. सप्टेंबर २०१५ पासून ७ मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे जिल्हास्तरीय तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. यातील पाहर्णी (ता. नागभीड) येथील सुरेश श्यामराव कुंभरे, गोविंदपूर येथील देविदास तुळशिराम येरकर, मांगली येथील रामदास मारोती घ्यार, मार्डा येथील मनोज एकनाथ पिंपळशेंडे, नंदोरी येथील प्रशांत भाऊराव टोंगे, करोडा येथील गुरुदेव किसन चलाख, धाबा येथील हरिश्चंद्र परशुराम चनेकर, गोजोली येथील विनायक सिताराम चौधरी, चिनोरा येथील रितेश गोपाळा ढेंगळे, महालगाव येथील संजय प्रभाकर बदकी, नवरगाव येथील तेजराम विठोबा बोरकर या आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा निपटारा जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून करण्यात आला. शेतकऱ्यांनी आत्महत्येच्या तारखेबाबत पत्र पाहून सांगतो. कदाचित ते प्रकरण २०१५ वर्षाचे असावे.
- डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी चंद्रपूर

Web Title: Due to the farmers' suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.