सरकारकडून शाळा सुरू करण्याची घाई नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:16+5:30
राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, येत्या २६ जुनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने पालक व शिक्षकांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याची तीव्रता वाढणार की कमी होणार, याबाबत सध्या काहीच ठोसपणे सांगता येतनाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी पालक त्यांच्या पाल्यांना पाठविणार का, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. जिल्हा परिषद शाळांच्या सर्वच इमारती संस्थात्मक क्वारंटाईनसाठी ताब्यात घेण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेलाच आधी प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, शासनाने लगेच शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असे मत पालक, शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, येत्या २६ जुनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने पालक व शिक्षकांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याची तीव्रता वाढणार की कमी होणार, याबाबत सध्या काहीच ठोसपणे सांगता येतनाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी पालक त्यांच्या पाल्यांना पाठविणार का, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारला जात आहे. विविध शाळांमधील विद्यार्थी संख्या लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, दोन सत्रांमध्ये शाळा भरविणे आदी अडचणीचे ठरणारे आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी होईपर्यंत शाळा सुरू नये. यंदाचे शैक्षणिक वर्षे उशिरा सुरू करताना अभ्यासक्रमाचे नव्याने दृष्टीने नियोजन करण्याची मागणी पालक व शिक्षकांनी केली आहे.
प्रतिबंधासाठी पर्याय स्वीकारा
मुलांनी एका बेंचवर एकालाच बसविणे, शाळांचे तास करणे, आजारी विद्यार्थी-शिक्षकांनी शाळेत न येणे, स्वच्छतागृहांची वारंवार स्वच्छता करणे, आदी पर्यायांचा स्वीकार शिक्षण विभागाला करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असून शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर अनिवार्य केला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक वर्ष आणि अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचा विचारही करता येऊ शकतो.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शाळा सुरू झाल्याच पाहिजे. मात्र, त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. जि. प. शाळांच्या इमारती क्वारंटाईनसाठी असल्याने लगेच सत्र सुरू करणे धोकादायक ठरू शकते. शासनाने याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
-विलास बोबडे, अध्यक्ष, म. रा. शि.प., चंद्रपूर
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीचा विचार करता जिथे कोरोनाचा एकही रूग्ण नाही तेथील शाळा सुरू केल्या पाहिजे. पण, शासनाने शाळेतील सर्वांना प्रतिबंधात्मक साधने उपलब्ध करून द्यावी. शिक्षक शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची खबरदारी निश्चितपणे घेतील.
-जे.डी. पोटे, निमंत्रित सदस्य,
शिक्षण समिती जि. प. चंद्रपूर
शाळा सुरू व्हावी असे वाटत असले तरी धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांना डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घ्यावा. ज्या शाळांतील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या शेवट्या व्यक्तीची सुट्टी होते. तिथून १५ दिवसांपेक्षा जास्त अंतराने शाळा सुरू करावी. सुरवातीचे काही दिवस सुट्टीत गेले तरी भरून काढता येईल.
-हरीश ससनकर, संयोजक क्रीएटीव्ह टीचर फोरम चंद्रपूर
शाळा सुरू करण्याचा अद्याप आदेश आला नाही. शासनाने निर्देर्शित केल्यानुसारच जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये आवश्यक खबरदारी घेण्यात येईल. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. शैक्षणिक सत्र सुरू करण्यापूर्वी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने लक्षात घेण्यात येणार आहे.
-दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक), जि. प. चंद्रपूर
जि. प. शाळांच्या इमारती क्वारंटाईनसाठी देण्यात आल्या. कोरोनाची साथ कधी संपेल, याची काही खात्री नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी शासनाची आहे. शैक्षणिक सत्र वाया जाईल, या धास्तीने शासनाने धोका पत्करू नये.
-शंकर भेंडे, पालक चंद्रपूर