लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हाताला काम नसल्यामुळे गावागावातील बेरोजगारांमध्ये सध्या नैराश्य आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. काही युवक नवीन कामधंद्याच्या शोधात आहे. दरम्यान, दिवाळी आली असतानाही हातात पैसा नसल्याने त्यांच्यामध्ये अधिकच नैराश्य वाढले आहे.सध्या युवकांपुढील मोठे आव्हान नोकरीचे आहे. काहींनी खासगी तसेच इतरत्र नोकरी मिळविली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यांनाही बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. उच्च शिक्षण घेतल्यामुळे अनेक बेरोजगार इतर कामे करायचे धाडस दाखवित नाही. काही जण याला अपवाद आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या शहरातील बहुतांश तरुण गावाकडे परतले आहे. त्यामुळे हाताला काम नसल्याने त्यांच्या नैराश्य आले आहे.काही युवक शेतीकामात हातभार लावून कुटंूबीयांना मदत करीत आहे. मात्र शेती बेभरवश्याची असल्यामुळे यामध्ये त्यांचे लक्ष लागत नसल्याने मोठ्या विवंचनेत सध्या ते अडकले आहे. त्यातच आता दिवाळी आली असतानाही हाताला काम नाही, पैसाही नाही. त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
दिवाळी असतानाही बेरोजगारांमध्ये नैराश्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 05:00 IST