लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमांकन करून भूमी अभिलेख तयार करावे, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमांकनाबाबत महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २३ फेब्रुवारी २०२२ रोजी बैठक आयोजित करून सदर प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अवलोकनार्थ सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ३ वर्षाचा कालावधी लोटूनही अजूनपर्यंत गावाचे नकाशे, इजाफा, आकारबंद असा कोणताही रेकॉर्ड तयार करण्यात आलेला नाही.
या १४ गावांचे जमिनीचे रेकार्ड नाहीत्यामुळे महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील जिवती तालुक्यातील मुकदमगुडा, तांडा, परमडोली, लेंडीजाळा, अंतापूर, येसापूर, भोलापठार, (कोठा बु), महाराज गुडा, पद्मावती, इंदिरानगर, पळसगुडा व लेंडीपुरा, शंकरलोधी या १४ गावांच्या जमिनीचे रेकॉर्ड अद्याप तयार झालेले नाहीत, जमीन मोजणीनंतरच्या पुढील कार्यवाहीस विलंब होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कामकाजाविषयी कमालीचा असंतोष निर्माण झालेला आहे. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील या १४ गावांचे सीमांकन करून तत्काळ भूमी अभिलेख तयार करून देण्याबाबतचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुभाष धोटे यांनी केली आहे.