कोविड संकटात डेपो विभागात चार महिन्यांपासून पाण्यासाठी हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:30 AM2021-05-06T04:30:22+5:302021-05-06T04:30:22+5:30
शेकडो महिला मजिप्रा कार्यालयात धडकल्या बल्लारपूर : कोविड संकटात सापडलेल्या नागरिकांना पाणी संकटाचा सामना करावा लागत असून डेपो विभागात ...
शेकडो महिला मजिप्रा कार्यालयात धडकल्या
बल्लारपूर : कोविड संकटात सापडलेल्या नागरिकांना पाणी संकटाचा सामना करावा लागत असून डेपो विभागात मागील चार महिन्यांपासून नळाला सुरळीत पाणी येत नसल्यामुळे पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.
यामुळे शेकडो महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यालय गाठून ही समस्या त्वरित सोडविण्यासाठी माजी सभापती सुवर्णा मुरकुटे यांच्या नेतृत्वात निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे ही अनेकदा पाणी संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणी सुरळीत करण्याची मागणी केली असताना सुद्धा मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे साईबाबा वॉर्डातील लोकांना पैसे देऊन नगरपरिषदचे पाणी टँकर बोलवावे लागले व पाण्याची तहान भागवावी लागत आहे. नळ बंद असूनसुद्धा मजीप्रा ग्राहकांना पाण्याचे बिल पाठवित आहे. यामुळे नळ ग्राहकांना बिलाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. जोपर्यंत नळाला पाणी येत नाही, तोपर्यंत नळाचे बिल न भरण्याचा ग्राहकांनी निर्धार केला आहे तसेच नळ बिल माफ करण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास डेपो विभागातील नळ ग्राहकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.