लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूजन्य साथ आजाराने देशातच नव्हे तर जगात थैमान घातले आहे. परिणामी, जनजीवन ठप्प झाले असून, लग्न सोहळ्यावरही संक्रांत आली आहे. यामुळे वधू-वरांच्या पालकांना लग्न सोहळे रद्द करावे लागत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील तारखांच्या मुहूर्तावरील मंगल कार्यालयात केलेली बुकींग अनेकांनी रद्द केली आहे.पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले होते. त्यानुसार शहरातील मंगल कार्यालयात या तारखेत बुकिंग झाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे बुकिंग रद्द करावी लागत आहे. मे महिन्यामध्ये एकून नऊ विवाह मुहूर्त आहेत. २, ६, ८, १२, १४, १७, १८, १९, २४ या लग्नतिथींच्या तारखा आहेत. त्यामुळे अनेक वधू-वर पालकांनी या तारखांमध्ये आपल्या मुला-मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालयात बुकिंग केले होते. पण कोरोनाचे संकट असल्यामुळे काही बुकिंग रद्द केली आहे. चंद्रपूर शहराचा विचार केल्यास जवळपास ५० ते ६० च्या आसपास मंगल कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयातील लग्नासाठी बुकिंग झालेल्या बहुतांश तारखा वधू-वर पालकांनी रद्द केल्या आहेत. लग्न सोहळ्यासाठी नातेवाईकांसह २० माणसांची अट असल्यामुळे बहुतांश पालकांनी यंदा होणारे लग्न पुढे ढकलले आहेत.लॉकडाऊन कालावधी ३ मे पर्यंत असला तरी वधू-वर पालकांनी जून महिन्यातीलही मंगल कार्यालयात केलेली बुकींगही रद्द करून यंदा लग्न नकोच म्हणून आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. तर काही जण मोचक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रशासनाची परवानगी घेऊन लग्नसोहळा उरकला जात आहे. त्यातच दुसऱ्या जिल्ह्यात लग्न असलेल्यांना तर अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने लग्न रद्द करणेच योग्य ठरत आहे.दोन महिन्यातल्या बुकिंग रद्दएप्रिल आणि मे महिन्याच्या सर्व तारखा लग्नसाठी बुकींग झाल्या होत्या. अनामत भरुन मंगल कार्यालय बुक केले होते मात्र कोरोनामुळे संबंधितांनी बुकींग रद्द केली आहे. यंदा या संकटामुळे आम्हाला महिन्याला पंचवीस ते तीस लाखाचे नुकसान सहन करावे लागले आहे. जून महिन्यातील तीन-चार तारखा बुक होत्या. मात्र त्याही रद्द होत असल्याचे संचालकाचे म्हणणे आहे.महिन्याला ५० लाखांचे नुकसानमंगल कार्यालयात होणारे लग्न सोहळे रद्द झाल्यामुळे कार्यालयांचे महिन्याला प्रत्येकी १० ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. स्वयंपाकी, पुजारी, मंडप, लाईट, फुलवाले या सर्वांचे नुकसान झाली आहे. तसेच या सर्वांच्या अनुषंगाने मजुरांवरही उपासमारीची वेळ आहे.साथ द्या, कोरोनाला हरवाआधी कोरोना मुक्तीचा ध्या घ्या, शक्य असल्यास विवाह सोहळे पुढे ढकला, अन्यथा कुटुंबातच तेही १० लोकात आणि सामाजिक अंतर राखून विवाह उरका.
कोरोनामुळे विवाह सोहळ्यावरही आले निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST
पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले होते. त्यानुसार शहरातील मंगल कार्यालयात या तारखेत बुकिंग झाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे बुकिंग रद्द करावी लागत आहे.
कोरोनामुळे विवाह सोहळ्यावरही आले निर्बंध
ठळक मुद्देएप्रिल, मे महिन्यातील लग्न तिथी रद्द : वाजंत्र्यांसह अन्य व्यावसायिकांवर परिणाम