चंद्रपूर : सिंचनासाठी शेतकऱ्यांची गरज ओळखा, शेतकऱ्यांना मृत्यूच्या मार्गावरून रोखण्यासाठी सिंचन पुरवा, वीज जोडणीसाठी थांबलेले कृषी पंप सुरू करा आणि १५ जूनपूर्वी अडीच हजार कृषी पंपांना कनेक्शन द्या, असदे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी अधिकाऱ्यंना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या साफल्य भवनात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ना. मुनगंटीवार बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार डॉ.संजय धोटे, आमदार सुरेश धानोरकर, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.एस.आर.हसनाबादे व आत्मा प्रकल्प संचालक डॉ.विद्या मानकर उपस्थित होते.पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने कृषी वीजपंपांची जोडणी मार्च २०१५ अखेरपर्यंत ४ हजार ५९९ जोडणी प्रलंबित आहे. त्यापैकी प्राधान्याने १५ जूनपर्यंत अडीच हजार कृषी वीज पंप जोडण्यात यावेत. यात दिरंगाई करणाऱ्यांंवर कडक कारवाई करुन दंड आकारण्याची शिफारस त्यांनी केली. ट्रान्सफॉर्मरबाबतही योग्य दक्षता घेऊन शेतक-यांना योग्य वेळेत पाणी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यवाही करावी. पाण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन बदलत्या वातावरणाचा अभ्यास करुन मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर पाण्याचे वाटप करावे. पाणी वाटप संस्थांना विश्वासात घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.बियाणांच्या बाबतीतही शेतक-यांना अधिक उगवणक्षमता असलेली बियाणे उपलब्ध करुन द्या. कृषी विद्यापीठानेही यावर दर्जदार संशोधन करायला हवे. संशोधनावर आधारित बियाणांच्या पुरवठादार कंपन्यांनी टंचाई भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. खत पुरवठादारांनीही नियमाप्रमाणे खतांची विक्री करावी. तसेच खताचा तुटवडा भासणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. चंद्रपूरातील रॅक पॉईटबाबतही गांभीर्याने विचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. खत पुरवठादारांनी कृषी विभागाशी समन्वय साधून योग्यवेळी खत पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.सन २०१५-१६ मध्ये खरीप हंगामाकरिता चार लाख ४७ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले. विविध पिकांकरिता चंद्रपूर जिल्ह्यास एकूण ९९ हजार ६५९ क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. जिल्ह्यास खरीप हंगामाकरिता एक लाख १० हजार २०० मे.टन रासायनिक खताचे आवंटन असून २९ एप्रिलपर्यंत १६ हजार पाच मे.टन खत प्राप्त झाले आहे. त्यापैकी एक हजार ६०५ मे.टन खताची विक्री झाली असून १४ हजार ४०० मे.टन रासायनिक खत शिल्लक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन पाठपुरावा करावा, असे निर्देशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिलेत. (जिल्हा प्रतिनिधी)
अडीच हजार कृषिपंपांना जूनपर्यंत जोडणी द्या
By admin | Updated: May 1, 2015 01:08 IST