मराठवाड्यातील शेतमजूर चंद्रपूर जिल्ह्यात

By Admin | Updated: April 17, 2016 00:35 IST2016-04-17T00:35:30+5:302016-04-17T00:35:30+5:30

गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे. यावर्षी त्याची दाहकता अधिकच वाढली आहे.

In Chandrapur district of the Marathwada | मराठवाड्यातील शेतमजूर चंद्रपूर जिल्ह्यात

मराठवाड्यातील शेतमजूर चंद्रपूर जिल्ह्यात

दुष्काळाची दाहकता वाढली : शेतावर गडी म्हणून करीत आहेत काम
रत्नाकर चटप नांदाफाटा
गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे. यावर्षी त्याची दाहकता अधिकच वाढली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुर हतबल झाला आहे. रोजगारच मिळत नसल्याने मराठवाड्यातील शेतमजुर रोजगाराच्या शोधात चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात दाखल झाले आहेत.
तेलंगणा सीमेलगतच्या कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांकडे गडी माणूस म्हणून या मजुरांनी काम स्वीकारले आहे. त्यापोटी एका वर्षाचे त्यांना ८० ते ९० हजार रुपये मिळणार आहे. सोबतच राहण्याची व इंधनाची सोय संबंधित शेतकरी या शेतमजुरांसाठी करून देत आहे. शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने शेतात काम मिळते. तसेच जिवती तालुक्यात २५ ते ३० वर्षांपासून मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी आदी जिल्ह्यातील नागरिक स्थलांतरीत होऊन कायम वास्तव्यास आहेत. माणिकगड पहाडावर शेती व्यवसायातून त्यांची गुजरान सुरू आहे. यंदा मराठवाड्या भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे तेथील शेतमजुर रोजगाराचा शोध घेत कोरपना ताालुक्यात दाखल झाले आहेत. गावात शेतीवर काम करणाऱ्या गडी माणसांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वाढत्या महागाईमुळे वर्षाचे ९० हजार ते १ लाख रुपयापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना केवळ गडी माणसाला द्यावी लागते. दुसरीकडे हे काम करणारी माणसं मिळत नसल्याने शेतकरी बाहेरगावावरून माणसांना शेतावर कामासाठी आणत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांची ही गरज ओळखून दुुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील शेतमजुरांना येथील शेतकरी कामावर ठेवत आहेत. त्यांच्यासाठी शेतातच ताटवे, टिनाचे पत्रे लावून निवाऱ्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. काही शेतकरी वर्षभरासाठी जळावू लाकडांची व्यवस्था गडी माणसांना करून देत आहे. कोरपना तालुक्याला लागून तेलंगाणाची सीमा आहे. त्यानंतर मराठवाड्याची सीमा सुरू होते.

एकापाठोपाठ एक होत आहे दाखल
सुुरूवातीला आदिलाबादमार्गे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून दोन ते तीन शेतमजूर कोरपना तालुक्यात आले. त्यांना शेतकऱ्यांकडे राहण्याची व रोजगारांची संधी मिळाल्याने आता मराठवाड्यातील अनेक कुटुंब कामाच्या शोधात या परिसरात दाखल होत आहे.

तिकडं गुराढोरांची लई बेकार अवस्था
मराठवाड्यात दुष्काळामुळे माणसांबरोबरच गुरढोरांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. पाणी नसल्याने शेतात चारा नाही. नाले, नद्या कोरड्या झाल्या आहे. अहो माणसाले पाणी मिळेना अशी अवस्था आहे असे मामा कांबळे किनवट या शेतमजुराने सांगितले.

पाण्यासाठी जातो पूर्ण दिवस
यावर्षी मराठवाड्यात पाऊस नसल्याने गावातील विहीरी, लहान नाले आटले आहेत. शासनाकडून कााही दिवस टँकरनी पाणी पुरवठा करण्यात आला. त्यातही अर्ध्या लोकांची तहान भागली तर अर्धे गावकरी पाण्यासाठी आटापिटा करीत राहिले. आता टँकरही येत नाही. पाण्यासाठी लांब अंतरावरून एखाद्या विहिरीतून पाणी आणावे लागते. एकाच विहिरीवर सारा गाव पाणी भरतो.

Web Title: In Chandrapur district of the Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.