चंद्रपूर : जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी झाली असली तरी अनेक ठिकाणी अवैध दारूविक्री होत आहे. प्रवासी वाहन, मालवाहू वाहन, दुचाकी अशा विविध वाहनांद्वारे दारूची आयात केली जात आहे. ही अवैध दारूविक्री रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागानेही कंबर कसली असून मालवाहू वाहन किंवा प्रवासी वाहनाद्वारे दारूवाहतूक करताना आढळल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची २४ जून बुधवारपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत. सामाजिक संघटनांच्या आंदोलनामुळे राज्य शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. दारूबंदीला तीन महिन्यांचा कालावधी होत आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. अवैध दारूविक्री रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाने पथक गठित करून दारूविक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र तरीही पूर्णपणे अवैध दारूविक्रीवर आळा घालता आलेला नाही. प्रवासी वाहन, मालवाहू वाहन, दुचाकी अशा विविध वाहनांद्वारे दारूची आयात करून जादा दरात दारूविक्री होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. दारूविक्रेत्यांमध्ये कारवाईविषयी कोणतीही भीती नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दारूची आयात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे उप प्रादेशिक परिवहन विभागाला सुचविले होते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द करण्यास सहमती दर्शविण्यास आली. या कारवाईत वाहनधारकाला तीन संधी दिली जाणार असून तीन संधीमध्ये तळजोड म्हणून शुल्क आकारले जाणार आहे. यात पहिल्या संधीत ३० हजार रूपये, दुसऱ्या संधीत ४५ हजार रूपये, तिसऱ्या संधीत ६० हजार रूपये व त्यानंतरही ‘त्या’ वाहनाने दारूवाहतूक झाल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी कोणत्याही प्रकारच्या वाहनाद्वारे दारूची वाहतूक करू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वाहनधारकांनो सावधान !
By admin | Updated: June 25, 2015 01:18 IST