प्रशासनाचे दुर्लक्ष : कारवाईची मागणी चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला असून याकडे आरोग्य विभाग, अन्न व औषधी प्रशासन व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. हिच संधी साधत बोगस डॉक्टर रुग्णांची आर्थिक लुट करीत त्यांच्या जीवनाशी खेळ करीत आहेत.काही डॉक्टरांनी बोगस पदवी घेऊन जनतेची दिशाभूल करीत त्यांची आर्थिक लूट करीत आहे. हे डॉक्टर ग्रामीण भागात घरोघरी जावून रुग्णांवर शर्थीने उपचार करतो, असे सांगत आहे.या डॉक्टरांना अधिकार नसतानासुद्धा ते जिल्ह्यटातील ग्रामीण भागात विशेषत: अतिदुर्गम भागात जावून आपली सेवा देत आहे. रुग्णांना सलाईन तसेच इंजेक्शनसुद्धा देत आहे. मात्र याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. यामुळे बरेचदा चुकीचा उपचार होऊन रुग्णांना आपला जीवसुद्धा गमवावा लागल आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यताप्राप्त डॉक्टरांची यादी प्रत्येक आरोग्य केंद्राच्या सूचना फलकावर लावावी, अशी माणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ नुसार वैद्यकीय व्यवसायासाठी महाराष्ट्र वैद्यक परिषद (एमबीबीएस), महाराष्ट्र समचिकित्सा परिषद (बीएचएमएस व डीएचएमएस) महाराष्ट्र भारतीय चिकित्सा परिषद (बीएएमएस), महाराष्ट्र दंत वैद्य परिषद (बीडीएस) महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी वरील पात्रता आवश्यक आहे. मात्र कोणतीही पदवी न घेता रुग्णांवर उपचार केला जात आहे. गोंडपिपरी, पोंभुर्णा, जिवती, कोरपना आदी तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या मोठी आहे. बोगस डॉक्टरांना बेकायदेशिररित्या औषधी पुरवठा करणारे फार्मासिटचीसुद्धा चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By admin | Updated: July 27, 2014 23:40 IST