लाभार्थ्यांना वयाचा पुरावा ठरत आहे गौण
By Admin | Updated: December 25, 2014 23:30 IST2014-12-25T23:30:07+5:302014-12-25T23:30:07+5:30
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ वृद्धपकाळ या योजनांची शासनाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य अंमलबजावणी केली जात नाही. परिणामी अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे

लाभार्थ्यांना वयाचा पुरावा ठरत आहे गौण
भेजगाव : संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ वृद्धपकाळ या योजनांची शासनाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य अंमलबजावणी केली जात नाही. परिणामी अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत.
श्रावणबाळ वृद्धपकाळ या योजनेसाठी वृद्ध लाभार्थी हे ६५ वर्षे वयाचे असावे, अशी अट आहे. त्या संबंधी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या अटीला धरुन आजपर्यंत मूल तहसील कार्यालयातून प्रकरणे मंजुर झाली. मात्र आता वैद्यकीय अधिकाऱ्याचे ६५ वर्षे वयाचे प्रमाणपत्र असतानासुद्धा केवळ राशनकार्डवरील व मतदान ओळखपत्रावरील वय चुकीचे असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर होत आहेत. परिणामी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा पुरावा गौण ठरत आहे.
या योजनेअंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी वृद्ध व अशिक्षित असल्याने बहुतेक जणांना स्वत:ची जन्मतारीख माहित नाही. त्यामुळे यावेळी तयार झालेले ते मतदान कार्ड व राशनकार्ड यावरील जन्मतारखा आणि त्यानुसार वय अंदाजे टाकले असल्याने ते चुकीचे आहे. परिणामत: ८० वर्षांच्या वृद्धांनासुद्धा या योजनेपासून वंचित ठेवणाचा प्रकार तालुका प्रशासनाकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे या वृद्ध निराधार लाभार्थ्यांचे अर्ज गावपातळीवर तलाठी कार्यालयातून भरला जातो. तलाठी कार्यालयातून अर्ज तालुकास्तरावर पाठविला जातो. तालुकास्तरावरुन पाठविला जातो. तालुकास्तरावरून त्रुट्या आल्या की, तलाठ्यांना परत लाभार्थ्यांना सांगून त्रुट्या पुर्ण करेपर्यंत बराच काळ लोटत असल्याने ही प्रकरणे प्रलंबित राहत आहेत.
राज्यातील विधवा, घटस्फोटीत महिला यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना राबविण्यात येते. या योजनांचा लाभ गोरगरीब, निराधार जनतेला मिळावा, यासाठी शासनाने प्रत्येक तालुकास्थळावर एक स्वतंत्र कार्यालय तयार केले आहे. त्याचे नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. असे असूनही गरीब महिला, वृद्धांना या योजनांचा लाभ दिल्या जात नाही.
या योजनांचा लाभ घेणारा वर्ग निराधार महिला आणि गरीब वृद्ध आहेत. ज्या आई- वडिलांचा सांभाळ पोटची मुले करीत नाहीत. त्यामुळे त्याच्यावर भीक मागण्याची पाळी येते. अशा व्यक्तीसाठी श्रावणबाळ योजना आहे. परंतु अशा किती वृद्ध दाम्पत्यांना त्याचा लाभ दिला जातो, हा प्रश्नच अनुत्तरीत आहे. वृद्ध दाम्पत्य आज गल्लोगल्ली भीक मागत आहे. उल्लेखखनीय म्हणजे अनेक मुले- मुली आपल्या वृद्ध आई-वडिलांना पुढे करीत या योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे येत आहे. गरीब लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात, याची माहिती अधिकारी देण्यास टाळाटाळ करतात. एखादा कागद जोडला नसेल तर त्याला तो कागद जोडण्याचे सांगण्याऐवजी त्याच्या अर्जाला सरळ केराची टोपली दाखवली जाते.
शासनानेसुद्धा लाभार्थी पात्रतेच्या अटी अत्यंत क्लिष्ट करून ठेवल्या आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांला योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे गोळा करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. कागदपत्रे गोळा केली तर त्यामध्ये अनेक चुका दाखवून त्या लाभार्थ्यांना अधिकारी हाकलून लावतात, अशा तक्रारी आहेत. (वार्ताहर)