नागरिकांचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही ग्रामपंचायतीचा ठेंगाघुग्घूस: येथील ग्रामपंचायतीच्यावतीने घुग्घूस शहरात बुधवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली खरी, परंतु या मोहिमेदरम्यान दुजाभाव करण्यात आल्याच्या प्रकाराने ही मोहीम वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील पथकाने बुधवारी दुपारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यास सुरूवात केली. त्यात अनेकांचे पक्के ओटे तोडण्यात आले. दुकानांसमोर अतिक्रमणात बांधलेले शेडही हटविण्यात आले. मात्र बाजारातील मांस विक्रीच्या दुकानाकडे या पथकाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांंमध्ये रोष व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटविताना काही ठिकाणी या पथकातील सदस्यांशी अतिक्रमणधारकांचा चांगलाच वादही झाला. मुळात ही मोहीम मंगळवारी राबविण्यात येणार होती. मात्र पोलीस संरक्षण न मिळाल्याने ती बुधवारी राबविण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान, बाजारातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना एका मांस विक्रीच्या दुकानाजवळी अन्य दुकानदारांचे अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र मांस विक्रीचे दुकानही अतिक्रमणात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही दुकानदार उपस्थित नसताना त्यांच्या दुकानातील आलमाऱ्या पाडण्यात आल्या. ही अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अगोदर संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी सर्वच अतिक्रमण हटविणे अपेक्षित होते. मात्र मर्जीतील दुकानदारांना पुन्हा मुदत देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर पक्के बांधकाम करण्यात आले. त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, संवर्ग अधिकाऱ्यांना दिले होते. चौकशीत अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांत अतिक्रमण हटविण्याचे आदेश घुग्घूस ग्रामपंचायतीला दिले होते. दिवसानंतरही कार्यवाही झाली नाही. ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर पक्के बांधकाम करणाऱ्या त्याच इसमाचे बाजारात मांस विक्रीचे दुकानही आहे. त्याला अतिक्रमण मोहिमेतून सुट देण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)
घुग्घूसमधील अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव
By admin | Updated: June 19, 2015 01:48 IST