सुभाष भटवलकर लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे या गावामध्ये एक कोळसा काढणारी प्रायवेट लिमिटेड कंपनी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करून प्रलोभन दाखवत त्यांची शेती दलालामार्फत कमी किमतीने विकत घेत असून, शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता शेती चोर मार्गाने घेत असल्याचा घाट आखला जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. यावर शासनाने त्वरित निर्बंध लावून गावातील सर्व शेतकऱ्यांची सभा घेत शेती खरेदी-विक्रीला अनुमती द्यावी, अशी मागणी नांदगाव (पोडे) परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत काही शेतकरी बांधवांनी बल्लारपूर तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याकडे यासंदर्भात निवेदन दिले आहे. काही महिन्यांपासून नांदगाव पोडे गावात दलालामार्फत तथाकथित कोळसा काढणारी एक प्रायवेट लिमिटेड कंपनी प्रलोभन दाखवून शेत खरेदी करत आहे. यामुळे कवडीमोल भावाने शेतकऱ्यांची शेतजमीन ते गिळंकृत करत आहे व आपला हेतू सिद्ध करत आहे. याबाबत तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार व योग्य कारवाई करणार, असे सांगितले.
गोपनीय पद्धतीने सुरू आहे गोरखधंदाएवढ्या गोपनीय पद्धतीने खरेदी-विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. काही शेतकऱ्यांना याची कुणकुण लागली. त्यांनी यासंदर्भात बल्लारपूर तहसीलदार कोकाटे यांना निवेदन दिले. याबाबत योग्य कारवाई करून गावातील सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेत शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करूनच नंतर शेती महाराष्ट्र सरकार अधिग्रहण कायद्यानुसार घ्यावी. ज्या शेतकऱ्यांच्या शेती चोर मार्गाने घेतली आहे. त्या सर्व शेतीची रजिस्ट्री व फेरफार त्वरित थांबवण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.