जिल्ह्यात ११ ठिकाणी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:56+5:30
लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करण्यात यावे आणि पुढे दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपले भरमसाठ आलेले वीज बिल महावितरणच्या उपविभागीय अभियंता व वीज अधिकारी कार्यालयात परत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करण्यात यावे आणि पुढे दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपले भरमसाठ आलेले वीज बिल महावितरणच्या उपविभागीय अभियंता व वीज अधिकारी कार्यालयात परत केले.
शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, जिवती, भद्रावती, वरोरा, मूल, सावली, पोंभुर्णा या तालुकास्थळी आणि गडचांदूर अशा ११ ठिकाणी समितीचे कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने आपले वीज बिल घेऊन गेले आणि तेथे अधिकाऱ्यांना कोरोना काळात भरमसाठ वीज बिल आल्याचे सांगून ते परत केले.
या आंदोलनाचे नेतृत्व गोंडपिपरी येथे माजी आमदार अॅड. वामनराव चटप, अरुण वासलवार, व्यंकटेश मल्लेलवार, तुकेश वानोडे, डॉ. संजय लोहे, रेखा राठोड, चंद्रपूर येथे किशोर पोतनवार, मितीन भागवत, हिराचंद बोरकुटे, गोपी मित्रा, अनिल दिकोंडवार, दिवाकर माणूसमारे, राजुरा येथे अॅड. मुरलीधर देवाळकर, मधुकर चिंचोलकर, प्रभाकर ढवस, वरोरा येथे अॅड. शरद कारेकर, भद्रावती येथे सुधीर सातपुते, प्रा.सचिन सरपटवार, राजू बोरकर, कोरपना येथे अरुण नवले, रमाकांत मालेकर, सावली येथे गोपाल रायपूरे, मनोहर गेडाम, मूल येथे कवड्ड येनप्रेडीवार यांनी केले. गडचांदूर येथे प्रभाकर दिवे, मदन सातपुते, पोंभुर्णा येथे गिरीधरसिंह बैस, बबन गोरंटीवार व जिवती येथे नीलकंठ कोरांगे, अॅड. श्रीनिवास मुसळे यांनी केले. सर्व कार्यालयात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.
या आहेत मागण्या
लॉकडाऊन काळात दोनशे युनिटपर्यंत वीज पुरवठा मोफत करण्यात यावा, सध्या दिलेली बिले परत घ्यावीत, विजेचा उत्पादन खर्च अडीच रुपये असताना घरगुती वापराकरिता सरासरी साडेसात रुपये बिलाची प्रति युनिट आकारणी केली जाते आणि औद्योगिक वापराकरिता प्रति युनिट साडेअकरा रुपये दर आकारले जातात. ही दोन्ही दरे निम्मे करण्यात यावे, गेल्या तीन वर्षांपासून विदर्भात दुष्काळ असल्यामुळे कृषिपंपाचे सर्व थकीत वीज बिल माफ करण्यात यावे, शेतीला पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज पुरविण्यात यावी, मागेल त्याला तत्काळ वीज पुरवठा करण्यात यावा आणि विदर्भातील लोडशेडींग संपविण्यात यावी, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.