लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील वर्षभरात जिल्ह्यात अवैध दारूची निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या १ हजार ६६८ आरोर्पीना अटक केली. नियम धाब्यावर बसविणाऱ्या १५१ दारू दुकानांविरुद्धही कारवाई झाली. १२९ अनुज्ञप्तीधारकांवर ४७ लाखांचा दंड ठोठावला, तर १५ दुकाने ५ ते १५ दिवसांपर्यंत निलंबित ठेवण्यात आली होती, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२३-२४ या वर्षात ९६३ गुन्ह्यांत ७७३ आरोपींना अटक झाली. त्यांच्या ताब्यातून ४२ वाहनांसह ९८ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या तुलनेत २०२४-२०२५ या वर्षात अवैध दारूविक्रीविरुद्ध दुपटीने कारवाया झाल्या.
अवैध दारूनिर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात नोंदविलेल्या १ हजार ८४० गुन्ह्यांत १ हजार ६६८ आरोपींना अटक झाली. त्यांच्या ताब्यातून १३५ वाहनांसह १ कोटी ९ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ९३ अन्वये सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी २४९ प्रस्ताव सर्व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केले.
१५१ परवानाधारकांडून नियमांचे उल्लंघनएप्रिल २०२४ ते मे २०२५ पर्यंतच्या तपासणीत १५१ अनुज्ञप्तींमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. याबाबतच प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी १२९ प्रकरणांत प्रत्येकी २५ ते ५० हजारांचा दंड ठोठावला. गंभीर प्रकरणात दारू दुकानांचे व्यवहार १५ दिवसांपर्यंत निलंबित करण्यात आले, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली.
"नागरिकांना आपापल्या परिसरातील अवैध दारू विक्रीची माहिती मिळाल्यास त्याबाबतची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ व व्हॉट्सअॅप क्र. ८४२२००११३३ वर नोंदवावी. दोषींवर नियमांनुसार कारवाई केली जाईल."- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग