हर्षनंदन वाघ / बुलडाणा: शहराला पाणीपुरवठा करणार्या येळगाव धरणात मुबलक जलसाठा असून, पावसाळ्यापर्यंत शहराची तहान भागणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात जाणवणार्या पाणीटंचाईची आणीबाणी यावर्षी बुलडाणेकरांना भासणार नाही.यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे अनेक ठिकाणी जलसंकट ओढवले आहे. तथापि, शहरवासीयांना मात्र या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेद्वारे ८0 हजार लोकसंख्येच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरी भागात नगरपालिकेद्वारे थ्री-व्हॉल सिस्टीमद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभातून शहर परिसरात थ्री-व्हॉल सिस्टीमद्वारे चवथ्या व पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत काही वर्षांत कमी पर्जन्यमानामुळे येळगाव धरणात जलसाठा कमी प्रमाणात होता. परिणामी नागरिकांना उन्हाळ्य़ाच्या शेवटी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. धरणात ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट नसले तरी जनतेने पाण्याचे नियोजन व काटकसरीने वापरण्याची गरज आहे.
यंदा ‘पाणीबाणी’ नाही !
By admin | Updated: February 4, 2015 01:30 IST