नीलेश शहाकार - बुलडाणाशासनाच्यावतीने मोठा गाजावाजा करीत गतवर्षी १ जुलै रोजी वन महोत्सव साजरा करत शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात वृक्ष लागवड करण्यात आली; मात्र त्यानंतर वृक्ष संवर्धनाकडे प्रशासनासह सहभागी सामाजिक संघटनांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने उन्हाळ्याच्या प्रारंभीच हे वृक्ष सुकले आहेत. पर्यावरण धोका निर्माण होत असल्यामुळे १ ते १५ जुलै २०१६ दरम्यान वन महोत्सव साजरा करून २ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था व विविध संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, तसेच पंधरा दिवसात शहर आणि ग्रामीण स्तरावर ३ लाख ४६२ वृक्ष लागवड करण्यात उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. मात्र मोठा गाजावाजा करून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन प्रशासन व सामाजिक संघटनांना करता आले नाही. शेवटी वृक्षारोपण अभियान केवळ प्रसिद्धीपुरतेच मर्यादित राहिले. आज वृक्षारोपण झालेल्या ठिकाणी केवळ खड्डेच शिल्लक राहिले आहे, तर हजारो रुपये खर्च करून लावण्यात आलेले लोखंडी ट्रिगार्ड केवळ वृक्ष सुकल्याने रिकामे असल्याचे दृष्टीस पडत आहे. वृक्ष अडकले अतिक्रमणातशहरातील मलकापूर-औरंगाबाद मार्गावर वन महोत्सवादरम्यान तब्बल १०० वृक्षांचे रोप करण्यात आले. त्यावेळी स्थानिक नगरपालिकेकडून या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे संपूर्ण रस्ता मोकळा होता; मात्र आज या मार्गावर लघू व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केल्यामुळे या मार्गावर लावण्यात आलेले वृक्ष व त्यांचे ट्रि गार्ड अतिक्रमणात गडप झाले आहेत.वृक्ष संवर्धनाचे दायित्व कोण घेणार?बुलडाणा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे सामाजिक दायित्व अनेक संस्थांनी नेहमीच जोपासले आहे. यातून शहरातील विविध मार्गांवरील दुभाजक व परिसरातील वृक्षांना पाणी देण्याचे काम दररोज सायंकाळी बुलडाणा अर्बन संस्था व नगर परिषदेकडून करण्यात येत होते. सुरुवातीला शहरातील वृक्ष टवटवीत दिसायची; मात्र नवीन वर्षात नगर परिषदेमध्ये सत्ता बदल झाला. आता शहरातील दुभाजकावर वृक्षाऐवजी मोकाट कुत्रे बसलेली आढळून येत आहेत. या कारणामुळे शहरातील वृक्ष संवर्धनाचे दायित्व कोण घेणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.