लोकमत न्यूज नेटवर्क, बुलढाणा : शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकरण रेशनमधील एका लॉटमधील सेलेनियमयुक्त गहू खाल्ल्यामुळे झाल्याचा निष्कर्ष चुकीचा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सिद्ध केल्यास डॉ. हिंमतराव बावस्कर पद्मश्री पुरस्कार परत देण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे. आवश्यकता भासल्यास ते पद्मश्री पुरस्कार परत देतील, असे खळबळजनक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे केले.
२ मार्च रोजी स्थानिक जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. सपकाळ पुढे म्हणाले, शेगाव केसगळती प्रकरणावर डॉ. बावस्कर यांनी केलेल्या संशोधनावर प्रशासनाने प्रसिद्धीसाठी असल्याचा ठपका ठेवला आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा अहवालही अद्याप प्राप्त झालेला नाही. सपकाळ यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सार्वजनिक वितरण प्रणालीतून मोठ्या प्रमाणावर वितरित होणाऱ्या धान्यावर प्रशासनाने गंभीरपणे लक्ष द्यायला हवे. हा आरोग्याशी खेळ आहे आणि भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे ते म्हणाले.