डोणगाव : राेहित्र बंद असल्याने गत दाेन महिन्यांपासून डाेणगाव येथील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राेहित्र दुरुस्त करून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
डाेणगाव परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली आहे. सध्या विहिरींना पाणीही मुबलक आहे. डोणगाव येथील दिनोरे यांच्या शेताजवळील विद्युत रोहित्र गत दोन महिन्यांपासून बंद असल्याने कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी शेतकरी आपल्या पिकांना पाणी देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी सुकली आहेत. त्यामुळे राेहित्र तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी सूरज दिनोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना २४ एप्रिल राेजी दिलेल्या निवेदनात केली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही अजूनही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील संत्री, पेरू व इतर झाडे पाण्याअभावी सुकत आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पेरलेला आहे. त्याचेही पाण्याअभावी माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. दाेन दिवसांत राेहित्र सुरू न केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे. निवेदनावर सुरेश अप्पा फिसके, जीवनसिंह दिनोरे, वसंतराव आखाडे, राजेंद्र आखाडे, जितेंद्र दिनोरे, सागर दिनोरे, आदींची स्वाक्षरी आहे.