.सिंदखेडराजा : अस्थीविसर्जनासाठी पैठणला जात असताना टाटा पिकअप गाडी पलटी होऊन एक ठार, तर १६ जण जखमी व ५ जण गंभीर जखमी झाले आहे. सदर अपघात २२ मे रोजी सकाळी ८.३0 वाजता सावरगाव माळ शिवारात घडला. शेंदुर्जन येथील रामकिसन नागरे यांचे १८ मे रोजी निधन झाले होते. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम २0 मे रोजी झाला. पवित्र स्थळी रक्षाविधी व्हावा, या धार्मिक भावनेतून रामकिसन यांच्या परिवारातील आणि नात्यागोत्यातील किमान ३0 ते ४0 महिला पुरुष आणि मुले एका टाटा पिकअपमध्ये बसून पैठणला निघाले होते. सिंदखेडराजा जालना रोडवरील सावरगाव माळ नजीक एका मोठय़ा खड्डय़ापासून वाहनाचा बचाव करीत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टाटा पिकअप वाहन पलटी झाले. त्यामध्ये सौंदाजी नागरे (७0) हे जागीच ठार झाले. तर रमेश तुकाराम नागरे, बालु वसंता घुगे, गीता नाना मान्टे, लक्ष्मण किसन मुंढे, श्रीराम जायभाये (भंडारी) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर पूजा रमेश नागरे, संतोष रमेश नागरे, भागवत रामकिसन नागरे, ज्ञानेश्वर रामकिसन नागरे, नर्मदा रामकिसन नागरे, सचिन गणेश नागरे, शीला पंढरी नागरे, नरहरी घुगे (पळसखेड चक्का), बबन रखमाजी काकड (कि.राजा) यांच्यासह १६ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती होताच जि.प.सदस्य दिनकरराव देशमुख, सभापती नाथाभाऊ दराडे, सरपंच संतोष शिंगणे, राजू शिंगणे, पुरुषोत्तम शिंगणे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य केले. घटनास्थळावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अपघातातील मृतक सौंदाजी नागरे यांच्यावर शोकाकुल वातावरणात शेंदुर्जन येथे चिताग्नी देण्यात आला.
एक ठार : १६ जखमी; पाच गंभीर
By admin | Updated: May 22, 2014 23:39 IST