विद्युत रोहित्र जळण्याच्या घटनांमुळे सिंचनाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 11:44 AM2020-12-18T11:44:39+5:302020-12-18T11:45:07+5:30

Buldhana News पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र आहे. 

Irrigation hit due to burning of electric Transformers | विद्युत रोहित्र जळण्याच्या घटनांमुळे सिंचनाला फटका

विद्युत रोहित्र जळण्याच्या घटनांमुळे सिंचनाला फटका

googlenewsNext

 लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या एक ते दीड महिन्यापासून वीज रोहित्र जळण्याच्या प्रकारामुळे रब्बी हंगामातील सिंचनाला फटका बसत असून,  गेल्या महिन्यात जिल्ह्यातील तब्बल ७० वीज रोहित्र जळाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र आहे. 
त्यातच जिल्ह्यात वीज रोहित्रासाठी आवश्यक असलेेले ऑईलही उपलब्ध होण्यात अडचणी आल्याने ही समस्या गंभीर बनली होती. प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते. सोबतच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना २३ नोव्हेंबर रोजी ऑईल उपलब्ध करण्यासाठी एक निवेदन दिले होते. त्याच्या परिणामस्वरुप सध्या जिल्ह्याला १२ हजार लिटर ऑईल उपलब्ध झाले असून या आंदोलनाचा परिणाम म्हणून वीज रोहित्र दुरुस्तीचे प्रमाणही महावितरणकडून आता वाढविण्यात आले आहे. 
वीज रोहित्र दुरुस्तीची प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी साधारणत: आठवड्याचा कालावधी लागत आहे. पूर्वी हाच कालावधी जवळपास एक महिन्याचा होता. मात्र आता त्यात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. गहू, हरभरा पिकांना वीज रोहित्र जळण्याच्या घटनांमुळे जिल्ह्यात मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. 
तक्रार करूनही प्रतीक्षेतच 
जिल्ह्यात दीड लाख कृषीपंपधारक शेतकरी असून १४, ५०० वीज रोहित्रावरून त्यास वीजपुरवठा होतो. दरवर्षी साधारणत: १,५०० वीज रोहित्र जळतात असा अंदाज आहे. त्यामुळे तक्रार करूनही वीज रोहित्र दुरुस्तीसाठी मोठा कालावधी लागत असल्याचे चित्र आहे. 


४० हजार लिटर ऑईलची गरज 
जिल्ह्यासाठी ४० हजार लिटर ऑईलची गरज असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर १२ हजार लिटर ऑईल जिल्ह्यास प्राप्त झाले असून टप्प्याटप्प्याने ते मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


वीज रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने पाणी उपलब्ध असूनही शेतीला पाणी देता येत नाही. यंदा पाण्याची उपलब्धता असतानाही ही अडचण आहे. वीज रोहित्र वेळेत दुरुस्त करून मिळाल्यास सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करणे शक्य होईल.          

 - प्रशांत कानडजे,  शेतकरी

Web Title: Irrigation hit due to burning of electric Transformers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.