मलकापूर : ठराविक शर्ती व अटींच्या धर्तीवर वाकोडी गावासाठीच्या महाजल योजनेत नळगंगा धरणाच्या पाणीपुरवठा पाईपलाईनला मलकापूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईनला जोडण्याची परवानगी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी आज २0 रोजी दिल्याची माहिती आहे. या विषयावरून पार पडलेल्या विशेष बैठकीत या विषयावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे सदर योजना हायज्ॉक होणार नाही या ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन झाल्याचे दिसत असून मलकापुरात पेटलेल्या पाणी प्रश्नाची तीव्रता कमी होण्यास त्याची मोलाची मदत होणार असल्याने मोठय़ा वादावर तूर्त पडदा पडला आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, मलकापुरात पाण्याचा प्रश्न पेटल्याचे सर्वश्रृत आहे. त्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र सुजल निर्माण योजनेत १३ कोटीची योजना मंजूर झाली आहे. मात्र सद्यस्थितीतील योजना समस्यांच्या विळख्यात असल्याने पाणीपुरवठा २१ व्या दिवसावर पोहचल्याने शहरातील पाऊण लाख नागरिक हतबल झालेत. अशात तात्पुरती उपाययोजना करण्यासाठी नळगंगा धरणात पाणी आरक्षित असल्याच्या धर्तीवर पालिका प्रशासनाच्या नजरा तालुक्यातील वाकोडी गावासाठीच्या महाजल योजनेकडे वळल्या. त्या योजनेतून वाकोडी व मलकापूर ग्रामीण अशा दोन गावातील नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा दिला जातो. कारण सदरची योजना अंतर्गत पाईपलाईन व जलशुध्दीकरण केंद्राअभावी विद्यमान स्थितीत अपूर्णच आहे. टँकर सुविधा दिवसभर चालणेकरिता रात्रीच्या काळात नगर पालिकेने पाण्याची मागणी केल्यावरून वाकोडी ग्रामपंचायत व नगर पालिका प्रशासनात वेगळाच संघर्ष मागील काळात सुरू झाला. त्यात राजकारणाचा शिरकाव झाल्याने परिस्थिती हाताबाहेर निर्माण झाली. अर्थात पाणी हा महत्वाचा मुद्दा असल्याने वाकोडी व नगर पालिका दोन्ही संस्थाचे म्हणणे त्यांच्या जागी ठिक होते. मात्र परिस्थिती बिकट वळणावर आल्याने जिल्हाधिकार्यांनी मध्यस्थी करावी असा सूर उमटला. त्याच धर्तीवर एका विशेष बैठकीचे आयोजन आज २१ रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, आ.चैनसुख संचेती, नगराध्यक्ष रशिदखॉ जमादार, वाकोडी सरपंच संजय काजळे, दोन्ही संस्थांचे मुख्य अधिकारी, माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी, पाणीपुरवठा विभागाचे सभापती राजेंद्र वाडेकर, आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही बाजुंची मते जिल्हाधिकार्यांनी ऐकून घेतली. आ.चैनसुख संचेती यांनी त्यांची बाजू यावेळी मांडली. माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी यांनी शहरात पेटलेल्या पाणी प्रश्नावर लक्ष वेधून दोन्ही बाजुंना समाधानकारक ठेवत उपाययोजना कशा पध्दतीने करता येवू शकते या विषयावरून भक्कम बाजू मांडल्याची माहिती सुत्रांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी पाण्याचा विषय किती महत्वाचा असतो या विषयावरून मार्गदर्शन करीत सामोपचाराने त्यावर उपाययोजनेसाठी आवाहन केले. तर वाकोडीतील महाजल योजनेला मलकापूर नगर पालिका पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन जोडण्यास त्यांनी मंजुरात दिल्याची माहिती असून ठराविक शर्ती व अटी त्यासाठी लावण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. आजच्या बैठकीत ठरल्यानुसार नळगंगा धरणातील आरक्षित पाण्याचा पाण्याच्या पैशांचा भरणा, टँकरसाठी तीन ठिकाणी स्टॅण्ड व विज बिलाचा भरणा आदिंची जबाबदारी नगर पालिकेवर निश्चित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रक्रियेत वाकोडी ग्रामपंचायतीला कुठलाही भुर्दंड पडणार नाही यासंदर्भातील खबरदारी या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान पाण्याच्या मुद्यावरून वाकोडी व मलकापूर शहरातील जनतेत मानवी संघर्ष होतो की काय? अशी परिस्थिती मागील पंधरवड्यात होती. मात्र जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या पुढाकाराने त्या स्वरूपाच्या वादावर तूर्त पडदा पडल्याचे मानल्या जात असून आजची बैठक यशस्वी झाल्याचे म्हटल्या जात आहे.
मलकापूरसाठी जलवाहिनी जोडण्यास हिरवा कंदील
By admin | Updated: May 20, 2014 23:50 IST