बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील ग्राम अटकळ (चौथा) येथे १९ जून रोजी रात्री ११ वाजता दरम्यान अचानक आग लागून पाच घरे भस्मसात झाली आहेत. यामध्ये अंदाजे ६ लाख ४८ हजाराचे नुकसान असून, यामध्ये दोन जण पूर्णत: बेघर झाले आहे. ग्राम अटकळ (चौथा) येथील फकीरा रामसिंग राजपूत, सुनील रामसिंग राजपूत, मोहन कवरसिंग राजपूत, ईश्वर कवरसिंग राजपूत व चरणसिंग कवरसिंग राजपूत या पाच जणांचे घरास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण करुन त्यांची मातीकुडाची घरे जळाली. यामध्ये फकीरा राजपूत व मोहन राजपूत हे दोघे पूर्णत: बेघर झाले असून, फकीरा राजपूत यांनी आपल्या चार वर्षीय मुलाचे ऑपरेशन करता ४५ हजार रोख रक्कम घरामध्ये ठेवली होती. तीही आगीमध्ये जळून खाक झाली. या आगीच्या भक्ष्यस्थानी त्यांचे घरगुती साहित्य, भांडी, कपडे, धान्य, बी-बियाणे व इतर साहित्य जळाले. यात फकीरा राजपूत यांचे दोन लाख ४0 हजार, मोहन राजपूत यांचे एक लाख ५0 हजार, चरणसिंग राजपूत यांचे ६0 हजार रुपये, सुनील राजपूत यांचे ३८ हजार असे एकूण सहा लाख ४८ हजाराचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी रात्री नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने ती इतरत्र पसरली नाही. रात्रीच बुलडाणा तहसीलदार दीपक बाजड, तलाठी गवई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. नुकसानग्रस्त नागरिकांना व बेघर झालेल्यांना शासनस्तरावरुन आर्थिक मदतीची मागणी केली.
पाच घरांना आग
By admin | Updated: June 21, 2014 00:00 IST