बुलडाणा : पावसाने महिनाभरापासून दडी मारल्यानंतर दोन दिवसांपासून शॉवरसारखा पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे काही परिसरात पिकांना जीवनदान मिळाले असून, दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. पेरणीच्या या दिवसात सध्या पावसाची प्रतीक्षा असतानाच निवडणुकीचे पीक जोमात फोफावले असून, सोमवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता ग्रामपंचायतचे राजकारण चांगलेच तापले आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी ५२१ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असून, गावपुढार्यांना आता सत्तेचे डोहाळे लागले आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करताना हे पुढारी दिसू लागले आहेत. गावागावात सत्तेसाठी चुरस निर्माण झाली आहे. सर्वांचे लक्ष सरपंचपदाकडे लागले आहे. ग्रामविकासाचा केंद्रबिंदू ग्रामपंचायत असते. त्यामुळेच सरपंचपद हे महत्त्वाचे मानले जात आहे. सरपंचपदासाठी आपले पॅनल व आपल्याच गटाचा उमेदवार विजयी व्हावा, यासाठी अक्षरश: स्पर्धा लागल्याचे दिसते. पाच वर्षांपूर्वी गटातटात विभागलेली गावे आता पूर्वपदावर आली, असे वाटत असतानाच निवडणुकीचा बिगुल फुंकला गेला आहे. पुन्हा गावागावांत गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षाचे उमेदवार नसतात. पक्षीय चिन्हही नसतात. शुद्ध चारित्र्याचा उमेदवार निवडण्याकडे मतदारांचा नेहमीच कल असतो; मात्र अनेकदा शुद्ध चारित्र्यवान व्यक्तीही निवडून आल्यावर जनतेला विसरल्यासारखा वागतो. अनेक ग्रामस्थांनी तसा अनुभव व्यक्त केला. गावपुढार्यांनी आपापले उमेदवार शोधून अर्ज दाखल करून प्रचारही सुरू केला आहे. गावावर वर्चस्व ठेवण्याची चढाओढ, गावातील दबदबा याकरिता गावपुढारी वाटेल ते राजकारण करताना दिसतात.
*सागवण ग्रामपंचायतमध्ये एकाच घरात चार वार्डाचे मतदार
बुलडाणा शहरालगत असलेल्या सागवण ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. येथील सहा वार्डामध्ये उमेदवारांनी फिल्डींग लावली असून उमेदवारांना आधी मतदार यादीचाच अभ्यास करावा लागत आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक एक सोडला तर उरलेल्या सहा वार्डामध्ये एकाच घरातील सदस्यांना विभाजीत करून मतदार नोंदणी केली आहे. वडील वार्ड क्रमांक दोन तर आई चारमध्ये, मुलगा सहामध्ये तर सून वार्ड पाच मध्ये अशा प्रकारे मतदारांच्या नावाची नोंद झाल्याचे समोर आले आहे.