लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर/शेलसूर : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली. चिखली- अमडापूर मार्गावरील दहीगाव फाट्याजवळ १२ मे रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याच्याविरुद्ध अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेलसूर येथील अंबादास सुभाष रिंढे (४१) हे पत्नी दीपाली (३५) व मुलगा कार्तिक (५) असे तिघेजण सोमवारी रात्री सासरवाडी बोरगाव काकडे येथे गेले होते. सासरवाडीत मुक्काम करुन सकाळी एम-एच-२८-एम-६३०० क्रमांकाच्या दुचाकीने उंद्री येथे जात होते. दरम्यान दहिगाव फाट्याजवळ एम-एच-२८-ए-झेड-३९२६ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये अंबादास रिंढे व मुलगा कार्तिक ठार झाले. तर पत्नी दीपाली गंभीर जखमी झाली.अपघाताची माहिती मिळताच अमडापूर ठाणेदार अमित वानखडे यांच्या मार्गदर्शनात एएसआय लक्ष्मण टेकाळे, वैद्य घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमीवर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुचाकीला धडक देणाऱ्या कारचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याच्याविरुद्ध अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतक सहकार विद्या मंदिरवर होते लिपीकअपघातातील मृतक अंबादास रिंढे हे मूळचे शेलसूर येथील रहिवासी आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते उंद्री येथील सहकार विद्या मंदिरवरमध्ये लिपीक म्हणून कार्यरत होते. तसेच उंद्री येथे त्यांचे टायपिंग इन्स्टिट्यूट होते. पत्नी, मुलगी व मुलासह ते उंद्री येथे राहत होते. मंगळवारी झालेल्या अपघातात ते व त्यांच्या मुलावर काळाने झडप घातली. मृतांवर शेलसूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती निधनाने रिंढे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.