काकनवाडा : अवकाळी पाऊस आणि वारा यामुळे नुकसान झालेल्या केळी पिकाचे अहवाल वरिष्ठांकडे अद्याप गेले नसल्याने केळी उत्पादक मदतीपासून वंचीत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांचेशी शेतकर्यांनी चर्चाही केली आहे. काकनवाडा परिसरात जूनच्या सुरूवातीला झालेल्या वादळाने येथील केळी उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे. यामध्ये हाताशी आलेले पीक उध्वस्त झाले. काकनवाडा खुर्द मध्ये ५.३५ हेक्टर, मोमीनाबाद २.७0 हेक्टर, सालाबाद 0.७0 हेक्टर व या व्यतिरिक्त काकनवाडा बु., पलसोडा शिवारातही नुकसान झाले आहे. हे सर्व क्षेत्रफळावरील नुकसान १00 टक्के असल्याचा अहवाल अद्याप तहसिलदार यांचेकडेच पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ठाकरे, शेतकरी नरहरी पाटील, संतोष अढाव, छोटू पाटील आदिंनी बुलडाणा येथे जावून जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा केली. त्यावेळी सदरचा अहवाल तहसिल कार्यालयातून पुढे सरकलाच नाही. हे उघड झाले. यामुळे जवळपास ५0 शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देवून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
केळी उत्पादक शेतकरी नुकसान भरपायीपासून वंचित
By admin | Updated: June 21, 2014 00:01 IST