अशोक इंगळे सिंदखेडराजा (जि.बुलडाणा), दि. ५ : तालुक्यातील हजारो शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या मदतीपासून वंचित असून, त्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पीक विम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली असून, ती कर्ज खात्यात वळती करण्याचा सपाटा बँकांनी लावला आहे. तो त्वरित थांबवून विम्याची रक्कम शेतकर्यांना द्यावी आणि जे ३0 टक्के शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. त्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा करावी, जेणेकरून त्यांना दिलासा मिळेल, अशी ही मदत तत्काळ मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तालुक्यात मागील वर्षी कोरडा दुष्काळ पडला होता. या दुष्काळाची दाहकता एवढी होती की, खरिपाची सर्वच पिके सुकली होती. पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले होते. पेरलेलं उगवलंच नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला होता. बँकेचे कर्ज डोक्यावर वाढल्याने काही शेतकर्यांनी आत्महत्यासुद्धा केल्या होत्या. सतत तीन वर्षे दुष्काळाची भीषण दाहकता अनुभवली होती. जवळजवळ सोयाबीन, कपाशी, ज्वारी, मूग, उडीद ही पिके न आल्याने पिकाची आणेवारी २२ पैसे आली. महाराष्ट्र शासनाने तालुका कोरडा दुष्काळात टाकला आणि हेक्टरी ६ हजार मदत जाहीर केली होती. ती मदत मार्च महिन्यात तहसील कार्यालयात आली. काही गावात मदत मिळाली; परंतु काही गावात ती मदत पोहोचली नाही. महसूल विभागाच्या तांत्रिक चुकांमुळे मदत परत गेल्याचे बोलल्या जाते. जे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले त्यांना मदत मिळावी म्हणून आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्यानंतरही अनेकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली होती.
३0 टक्के शेतकरी विम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 02:14 IST