विश्रामगृहाचे भवितव्य राजकारणातील व्यक्तींच्या इच्छाशक्तीवर अवलंबून पवनी : स्थानिक गांधी चौकात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्रामगृह अत्यंत दयनिय स्थितीत उभे आहे. इमारत विश्रामगृहाची असली तरी ते विश्रामगृह सद्यस्थितीत इतिहास जमा झालेले आहे आणि पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय कार्यालय तेथे स्थानांतरीत करण्यात आलेले आहे.गत ३५ वर्षापूर्वी पवनी तालुक्याचे ठिकाण नव्हते. त्यावेळी जिल्हा परिषद विश्रामगृह सराव या नावाने प्रसिद्ध होते. त्यावेळी लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी जिल्हास्तरावरून अधिकारी महिन्याकाठी सरावमध्ये येवून बसत व ग्रामीण जनतेच्या समस्या ऐकल्या जात होत्या. विश्रामभवनाच्या वऱ्हांड्यात त्यावेळी लोकांची वर्दळ असायची. काळात बदल झाला. अधिकारी सभांमध्ये व्यस्त झाले. पवनी तालुक्याचे ठिकाण झाले. लोकांना फारस्या समस्या उरल्या नाहीत. त्यामुळे सरावाची गरज संपली त्याचे विश्रामगृहात रूपांतर झाले. अलिकडे विश्रामगृहाची सुद्धा गरज ठरली नसावी. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. विश्रामगृह डागडूजी करून वापरण्या योग्य राहिले नाही. त्यांची नावाने बांधणी करणे गरजेचे आहे. चार पाच वर्षापुर्वी विश्रामगृह निर्लेखित करून नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने पारित केल्याचे आहे. परंतु अंमलबजावणी झालेली नाही. विश्रामगृहाची पुर्नबांधणी करायची म्हणजे बांधकामाचे मंजूरीपासून सर्व सोपस्कार करावे लागणार आहेत. पवनी शहरातील ऐतिहासिक गेटपासून ३०० मीटरपर्यंत बांधकामासाठी पुरातत्व विभाग परवानगी देत नाही आणि विश्रामगृह अवघ्या ५० मिटरच्या आत आहे म्हणजे शासकीय बांधकामांनासुद्धा पुरातत्व विभागाची परवानगी मिळणार नाही आणि जिल्हा परिषदेने तरतुद जरी केली तरी सहजरित्या बांधकाम करता येणार नाहीत त्यामुळे दोन सुट असलेले ब्रिटीशकालीन विश्रामगृह अखेर इतिहासजमा झाले, असे मानल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. विश्रामगृहाचे भवितव्य राजकारणातील व्यक्तींच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ठोस पावले उचलली तर विश्रामगृहास गतकालीन वैभव प्राप्त होण्यास विलंब लागणार नाही हे मात्र खरे आहे.
जिल्हा परिषद विश्रामगृह झाले इतिहासजमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 00:53 IST