पालांदूर : सुर्य आग ओकत आहे. तापमानाने कहर करीत ४७ अशांचा आकडा पार केला आहे. असह्य उकाड्याने जनता त्रस्त असताना नियम धाब्यावर बसवून काल मध्यरात्री महावितरणने भारनियमन केल्याने पालांदूर वाशियांना अक्षरक्ष: रस्त्यावर झोपण्याची वेळ आली.अत्यावश्यक भारनियमनाच्या नावाखाली दिवसभरात कितीही वेळा भारनियमन केले जाते. मात्र यातही त्यांचे सम्मयक झाले नसल्याने रात्री ११ ते १ पर्यंत भारनियमन न करून जनतेच्या अधिकारावर गदा आणला आहे. जनतेनी हा अन्याय खपवून घेणे म्हणजे आ बैल मुझे मार सारखी होय. लोकप्रतिनिधी, राजकीय नेते विजनवासात गेल्याने स्वत:च्या हक्काकरीता स्वत:च रस्त्यावर येणे गरजेचे आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पालांदूरची जनता शांत असल्याची जाणीव असल्याने कितीहीवेळा कोणत्याही वेळी भारनियमन केले तरी चालते. ही हुकूमशाही मोडण्याकरीता जनतेनी स्वत: नेतृत्व करणे महत्वाचे आहे.लोकप्रतिनिधी कंत्राटधारीत जाम खूष असल्याने जनतेच्या समस्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कृत्रिम विजेच्या भरोश्यावर आराम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना गरीबांच्या झोपेचे काय, भाळ मे जाय जनता हमारा काम बनता, अशी आमच्या लोकप्रतिनिधींची अवस्था आहे. काल रात्रीला सिमेंट रस्त्यावर, घराच्या गच्चीवर, डांबरीकरणावर चटई किंवा खाटेवर डासांच्या मधुरसंगितात हातवारे करीत लहान मुलांना झोपविण्याचा केविलवाणा प्रयत्न पालांदुरची जनता करीत होते. मनात विजविभागाविषयी कमालीचा राग व लोकप्रतिनिधीविषयी चीड व्यक्त होत होती. विज विभाग म्हणते, चारशे मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाल्याने अत्यावश्यक भारनियमन करावे लागत आहे. नियंत्रण विभाग साकोली यांच्या आदेशाचे पालक करणे आमचे काम आहे. तुमचा राग अपेक्षित आहे. पण आमचा नाईलाज आहे, असे विज कर्मचारी सांगत आहे. (वार्ताहर)
भारनियमनाचा कहर; जनता झोपली रस्त्यावर
By admin | Updated: June 11, 2014 23:10 IST