विहिरीची पातळी खालावली : उन्हाळी धान पीक धोक्यातकोंढा-कोसरा : चौरास भागात उन्हाळा जीवघेणा ठरत आहे. तापमान ४० अंशापेक्षा जास्त आहे. यामुळे लोकांचे उन्हामुळे हाल होत आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. याचा फटका उन्हाळी धान शेतीला व पिण्याच्या पाण्याच्या योजनेला बसणार आहे.कोंढा येथे आतापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. एक दिवसानंतर नळाला पिण्याचे पाणी मिळत आहे. कोंढा टोली पिण्याचे पाणी वर चढत नसल्याने आतापासूनच तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. कोंढा, कोसरा या दोन्ही गावांना पाणी पुरवठा करणारी मुख्य विहिरीच्या पाण्याची पातळी करणारी खोल गेली असल्याने पाणी समस्या जाणवते आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने पातळी खोल गेली आहे. ही परिस्थिती चौरास भागात गावागावात पाहावयास मिळते. या भागात शेतकऱ्यांनी शेतात सिंचन विहिरी बांधल्या आहेत. त्यांनी उन्हाळी धान पेरणी केली आहे. पण पाण्याची पातळी खोल गेल्याने कोंढा, कोसरा, सेंद्री खु., सेंद्री बु., सोमनाळा बु., रनाळा खैरी, लोन्हारा, आकोट, चुल्हाड, विरली खं., नवेगाव येथील शेतकऱ्यांचे उन्हाळी धान व अन्य पिके संकटात सापडले आहेत.चौरास भागातील अनेक गावात पाण्याचे स्त्रोत खालावले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दोन ते तीन किमीचे अंतर कापून पाणी आणावे लागत आहे. एप्रिल महिण्यात पिण्याच्या पाण्याची अवस्था वाईट आहे. तेव्हा मे महिण्यात चौरास भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण होऊ शकते. वैनगंगा नदीवरुन पाणी पाईपलाईनने आणून त्यांचे बाम्हणी येथे शुध्द करुन चौरास भागातील १५ गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची योजना तयार झाली आहे. पण तिचा वापर ठप्प असून कोट्यवधी रुपये या योजनेत खर्च झाले. योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने नागरिकांना पिण्याचे पाण्याची भटकंती करावी लागत आहे. समस्या सोडविण्याकडे नविन आमदारांनी लक्ष दयावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
चौरास भागात पाण्याची समस्या
By admin | Updated: April 28, 2015 00:35 IST