लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जीवनदायीनी वैनगंगा नदी कोपली असून जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुराने हाहाकार उडाला आहे. मध्यप्रदेशातील प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येत असल्याने वैनगंगा तिरावरील भंडारा शहरासह जिल्ह्यातील ५८ गावे जलमय झाली आहे. शेकडो घरांची पडझड झाली असून राज्य आपत्ती निवारण पथक आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाच्यावतीने नागरिकांना सुरक्षित बोटीच्या सहाय्याने हलविले जात आहे. मात्र अचानक आलेल्या या महापुराने मदत तोकडी पडत असून शेकडो नागरिक मदतीच्या अपेक्षेत आहेत.मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला, कालीसागर आणि महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील बावनथडी प्रकल्पाच्या पाण्याचा शनिवारपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील २५८ गावातील २६४६ कुटंबाना पुराचा फटका बसला आहे. भंडारा तालुक्यातील २३ गावातील १७९०, पवनी तालुक्यातील २२ गावातील ५०५, तुमसर तालुक्यातील पाच गावातील १२७, मोहाडी तालुक्यातील सहा गावातील १६७ आणि लाखांदूर तालुक्यातील दोन गावातील २७ कुटुंबा बाधित झाले आहेत.शनिवारी रात्रीपासून भंडारा शहरात वैनगंगा नदीचे पाणी शिरु लागले. रविवारी शहरातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वॉर्ड, गुरुनानक वॉर्ड, सिंधी कॉलनी, भगतसिंग वॉर्ड, काझी नगर, संत तुकडोजी वॉर्ड, भोजापूर, गणेशपूर, विद्यानगर परिसर, छत्रपती शिवाजी नगर, नागपूर नाका परिसर, शिक्षक कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, टप्पा मोहल्ला, महात्मा ज्योतीबा फुले कॉलनी, श्रीसीताराम सिटी, यशदा सिटी, प्रगती कॉलनी, बेला, खात रोड परिसर आदी परिसरात पावसाचे पाणी शिरले. शनिवारी रात्री पुराचे पाणी अनेक घरात शिरल्याने अनेकांनी छताचा आश्रय घेतला. अनेकांच्या घरात पाच फुटापर्यंत पाणी साचले होते. प्रशासनाला मदतीचे आर्जव करुनही मदत मिळत नव्हती. सुमारे दीडशे कुटुंबाना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले होते. सीताराम सिटी परिसरातील नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.भंडारा बसस्थानक परिसरात पहाटेपासून पुराचे पाणी शिरले. बसस्थानकात तीन फुट पाणी साचले होते. बीटीबी सब्जीमंडी छतापर्यंत बुडाली होती. वसाहतीसमोर उभे असलेले अनेक वाहने पाण्यात बुडाली. शहरातील शंभरच्यावर चारचाकी तर हजारच्यावर दुचाकी वाहने पाण्याखाली आली आहेत.भंडारा तालुक्यातील पेवठा, लोहारा, चिचोली, जुने पिंपरी गावाला पुराचा विळखा पडला आहे. जुनी पिंपरी गावातील २५० नागरिकांनी शनिवारी रात्री मंदिराचा आश्रय घेतला होता. रविवारी दुपारी राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने त्यांना सुरक्षीत स्थळी काढून त्यांना साहूली येथे नेण्यात आले. या गावातील ५० घरे या पुरात कोसळल्याचे प्राथमिक माहिती आहे. पिंडकेपार गावाला पुराचा विळखा पडल्याने त्यात ४०० लोक अडकले होते. या सर्वांना जुनी टोलीवर हलविले. आपत्ती व्यवस्थापन पथक तोकडे पडत असल्याने अनेकांनी मासेमारीच्या बोटीच्या सहाय्याने सुरक्षीत स्थळी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. दाभा येथे पुरस्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली मदत व बचावकार्य सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.राष्ट्रीय महामार्गावर तीन फुट पाणीभंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शिक्षक कॉलनी परिसरात तीन फुट पाणी साचले होते. वैनगंगेच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने राष्ट्रीय महामार्ग पहाटेपासून बंद होता. यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागपूर नाका परिसरातील छत्रपती शिवाजी नगरात अडकलेल्या १५ कुटुंबियांना सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला वारंवार विनंती करण्यात येत होती. मात्र शेवटपर्यंत त्यांना मदतीची प्रतीक्षाच करावी लागली.आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून असहकार्यभंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ आपत्ती व्यवस्थापन कार्यरत आहे. जिल्ह्यात महापूर आला असताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. विभागप्रमुखांशी वारंवार दूरध्वनीवरुन संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नव्हता. उलट जिल्हाधिकारी तात्काळ फोन घेऊन माहिती सांगत होते. माध्यम प्रतिनिधीसोबत सामान्य नागरिकही मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधत होते.पुर चढणार की उतरणा?, नागरिकात संभ्रमवैनगंगा नदीला आलेला पूर चढणार की उतरणार? असा संभ्रम दिवसभर कायम होता. रविवारी सकाळीपासून पुराचे पाणी चढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनासह विविध ठिकाणी नागरिकांनी संपर्क साधून पूर कधी ओसरण्याची शक्यता आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही स्पष्टपणे उत्तर देत नव्हते. त्यामुळे सोशल मिडीयातून विविध अफवा पसरत होत्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही सूचना मिळाली नाही.पुराच्या विळख्यातील तालुकानिहाय गावेभंडारा तालुका : तड्डी ३२ कुटुंब, टाकळी १४, गणेशूपर ५०, दाभा २७, भोजापूर ४७, लोहारा ४९७ नागरिक, पेवठा ३५० नागरिक, कोंडी ०४, करचखेडा २२, खमारी १५, कोथुरणा ८२, कारधा ३९०, खैरी १, कचरखेडा १०, दवडीपार बेला ३०, पिंडकेपार ३०, कोरंभी ३१, सालेबर्डी १८, आमगाव ०१, खैरी ०९, माटोरा ०३, खापा सालेबर्डी ०७, पिंपरी १२० कुटुंबाचा समावेश आहे.पवनी तालुका : मांगली चौ. ९० कुटुंब, इसापूर ५०, पौना बुज. १०, पौना खुर्द ३०, भोजापूर ३२, रुयाळ ६०, जुणोना ३, कुर्झा ७८, ईटगाव ४०, कोरंभी १०, गुडेगाव २, रेवणी ४, विमल ६, खातकेडा ४, वलनी २, शिवनाळा ४, वडेगाव २, ब्राम्हणी २, पवनी ३, येनोडा ३, कोदुर्ली ३० कुटुंबाचा समावेश आहे.तुमसर तालुका : तामसवाडी ४७, पांझरा १५, सीतेपार २५, परसवाडा २० आणि रेंगेपार २० कुटुंब,मोहाडी तालुका : बेटाळा ७, मुंढरी बुज. ८५, मुंढरी खुर्द ४५, देव्हाडा १४, निलजखुर्द ३, हिवरा १० कुटुंबाचा समावेश आहे.लाखांदूर तालुका : मोहरणा ४०, इटान १७ कुटुंबाचा समावेश आहे.
वैनगंगा कोपली, भंडारा शहर जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST
शनिवारी रात्रीपासून भंडारा शहरात वैनगंगा नदीचे पाणी शिरु लागले. रविवारी शहरातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वॉर्ड, गुरुनानक वॉर्ड, सिंधी कॉलनी, भगतसिंग वॉर्ड, काझी नगर, संत तुकडोजी वॉर्ड, भोजापूर, गणेशपूर, विद्यानगर परिसर, छत्रपती शिवाजी नगर, नागपूर नाका परिसर, शिक्षक कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, टप्पा मोहल्ला, महात्मा ज्योतीबा फुले कॉलनी, श्रीसीताराम सिटी, यशदा सिटी, प्रगती कॉलनी, बेला, खात रोड परिसर आदी परिसरात पावसाचे पाणी शिरले.
वैनगंगा कोपली, भंडारा शहर जलमय
ठळक मुद्देग्रामीण भागातही हाहाकार : अनेक गावे पाण्याखाली, ५८ गावातील २६४६ कुटुंबांना पुराचा फटका, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प