लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सहायकांचे मागील पाच महिन्यांचे मानधन थकीत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामरोजगार सहायक संघटना, तुमसरच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. निवेदनात थकीत मानधन तत्काळ अदा करण्यात यावे, अन्यथा ११ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शासनाच्या ८ मार्च २०२१ च्या आणि ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सहायकांची नेमणूक, कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि मानधन याबाबत स्पष्ट नियमावली देण्यात आली आहे. मात्र, हे शासन निर्णय असूनही प्रत्येक महिन्याला मानधन वेळेवर मिळत नाही व प्रत्यक्षात वारंवार दिरंगाई होत आहे.
कामबंद आंदोलनाचा इशारा८ ऑगस्टपर्यंत मानधन देण्यात आले नाही, तर ११ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर आता ही मागणी तातडीने सोडवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
नवीन व जुन्या निर्णयांमुळे द्विधाशासनाने नवीन शासन निर्णय लागू केल्यामुळे ग्रामरोजगार सहायकांमध्ये नवीन व जुन्या निर्णयांबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्या शासन निर्णयानुसार मानधन देण्यात येणार आहे, याबाबत शासनस्तरावरून स्पष्ट मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.