भाविकांचे आकर्षण : ऐतिहासिक स्थापनेला मिळाला उजाळाअशोक पारधीपवनी तीन शतकांपूर्वी पानघाटवर गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, हे गणेश मंदिर अडगळीत पडले होते. रांजीची (बास/वेळी) झुडूपांचे अस्तित्व वाढले. विघ्नहर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायांवरच या रांजीमुळे विघ्न ओढवल्याचे चित्र होते. गणेशचतुर्थीनिमित्त गणेशभक्तांनी श्रींच्या मंदिर परिसरातील रांजीचे झुडूप हटविले असून, जणू विघ्नहर्त्यावरील विघ्न टळल्याचा भास होवू लागला आहे.रांजीच्या झुडूपात सापडल्याने या मंदिरातील गणेशाला रांजीतील महागणपती अशी ओळख पडली. घोडेघाट वॉर्डातील युवा गणेशभक्तांनी गणेशोत्सवाचा विडा उचलून मूर्तीची स्थापना न करता रांजीतील महागणपती मंदिरात श्रीगणेश आराधना सुरु केली आहे. ऐतिहासीक पवनी नगरातील गणेश मंदिरांची संख्या व प्रत्येक मंदिरातील श्रीगणेशांच्या स्थापित केलेल्या मूर्ती यांचा विचार केल्यास प्राचीन काळात या नगरात मोठ्या संख्येने गणेशभक्त असावे असा अंदाज बांधता येतो. नगरातील लोक रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत झाले. येथील प्रसिद्ध मुरलीधर मंदिर, दत्तमंदिर, एकटांग्या मारोती मंदिर व अलीकडेच नवनिर्मित श्री टेम्बेस्वामी मंदिर परिसरात वैनगंगा नदी काठावरील पानखिडकी घाटालगत करकाचे रांजीत महागणपतीची स्थापना तीन शतकापूर्वी करण्यात आल्याचे अभ्यासकांचे मत आहे. नगरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भात एवढ्या मोठ्या आकाराची एकाच दगडात कोरलेली मूर्ती अस्तित्वात नसावी. साधारत: सात फूट उंच मूर्ती एकाच दगडात कोरलेली असून मंदिराचे भिंतीपासून अलिप्त आहे. मूर्तीसभोवार गाभाऱ्यातच प्रदक्षिणा करता येईल, अशी स्थापना करण्यात आलेली आहे. पवनी सध्या अस्तित्वात असलेल्या पुलाने जोडलेली नव्हती. त्यावेळी भंडारा मार्गाने येणारे पादचारी पानखिडकी मार्गे पवनीमध्ये प्रवेश करायचे व प्रथम श्री गणेश रांजीतील महागणपती व नंतर सर्वतोभद्र (पंचमुखी) गणेशाचे दर्शन घेवून कामकाजाला सुरुवात करायचे. भोसलेंच्या कालखंडात मंदिराचा जिर्णोद्धार झालेला असावा, असा कयास आहे. प्रसिद्ध मुरलीधर मंदिराची देखभाल नागपूर येथे वास्तव्यास असलेले काळीकर कुटुंबिय करीत आहे. महागणपती सुद्धा त्यांच्या मालकीच्या जागेत आहे. घोडेघाट वॉर्डातील युवा गणेशभक्तांनी गेल्या चार पाच वर्षापासून गणेशोत्सवात मंदिरावर विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता व मंदिराची रंगरंगोटी करणे सुरु केले आहे. परिसरात अजूनही करकाच्या रांजी आहेत. पूर्वी दाटीवाटीने करकाच्या रांजी होत्या. त्यामुळे रांजीतील महागणपती असे संबोधल्या जात होते. पूर्वी वैनगंगा नदीला महापूर यायचा. तेव्हा पुराचे पाण्याचा स्पर्श महागणपतीच्या पावलास झाला की पूर ओसरणे सुरु व्हायचे असे बुजुर्ग सांगतात. मनमोहक व आकर्षक मूर्ती असलेल्या परिसरात जाणारे भाविक महागणपतीचे दर्शन घेऊनच बाहेर पडतात.
‘रांजी’च्या विघ्नातून ‘विघ्नहर्त्यां’ची सुटका
By admin | Updated: September 23, 2015 00:52 IST