लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी :शिक्षणाचा गाजावाजा होत असतानाही जिल्हा परिषदेच्या व अनुदानित खासगी शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांसह शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही शाळांमध्ये चार वर्ग एका शिक्षकाकडे, तर काही शाळांमध्ये मुख्याध्यापकाचीही पदे रिक्त असल्याने शिक्षणाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न समाजात उपस्थित झाला आहे.
खासगी शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. काही शाळांमध्ये शालेय कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे. हे शिक्षक प्रतिमहिना फक्त ४-५ हजार रुपये मिळवून, आर्थिक झळ सोसत आहेत. विद्यार्थी प्रवेश, शाळेचा खर्च, तात्पुरती शिक्षक नियुक्ती व इतर खर्च भागवण्यासाठी वर्गणी गोळा करण्याची प्रथा सुरू आहे.
अनेक गावांमध्ये शिक्षकांच्या मागणीसाठी आंदोलन व शाळेला टाळे लावण्याची घटनाही घडत आहेत. शिक्षक भरती बंद असल्यामुळे अनेक वर्षापासून शाळांमध्ये एकही नवीन शिक्षक नियुक्त केला गेला नाही. शिक्षकांची सेवानिवृत्ती झाल्यामुळे अनेक पदे रिक्त आहेत. तसेच अधिकारी वर्गाची देखील पदे रिक्त आहेत. भंडारा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी प्रभारावर आहेत. तसेच ६२ मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागातील रिक्त पदाचा आकडा फुगला असला तरी ते पदे कधी भरणार हा मोठा प्रश्न आहे.
राज्यातीकल शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरूया पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिक्षक भरतीला मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये अंदाजे १० टक्के पदे रिक्त असून, सुमारे साडेचार हजार शिक्षकांची भरती होणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया पंधरा दिवसात सुरू होणार असल्याची माहिती आहे. पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू असून, जिल्ह्यातील अनेक रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांचे ग्रहण सुटण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असली तरीही तात्पुरत्या नियुक्ती व शिक्षणाच्या गुणवत्तेवर याचा प्रभाव पडत आहे. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा एक गंभीर प्रश्न बनलेला आहे.