संकट संपेना : शेतकऱ्यांचे नियोजन बिघडलेलाखनी : मृग नक्षत्राच्या प्रारंभाला वरुण राजाने जोरदार हजरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी जोमाने कामाला लागला. पऱ्हे पेरणीही जोमाने झाली. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून वरुण राजा बेपत्ता झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मागील वर्षीसारखाच कोरडा दुष्काळ पडण्याची भीती यावेळी व्यक्त होत आहे. विदर्भात आत्महत्येचे सत्र रोजच वाढत आहे. सहनशिलता संपल्याने मरणाशिवाय उपाय नसल्याच्या सकुंचित भावनेने शेतकरी जीव गमावत आहे. सन २०१३-१४ ला ओला दृष्काळ २०१४-१५ ला कोरडा दुष्काळ २०१५-१६ लाही कोरडा दुष्काळामुळे शेतकरी खचला आहे. शासनाकडूनही उपाययोजना होतांना दिसत नाही. महागाई आकाशाला भिडली आहे. रोजचा खर्च शेतीतून निघणे कठीण झाले आहे. दुधाचे भाव कमी होऊन खुराकीचे दर मात्र वाढतच आहेत. उद्योगधंद्यांना २४ तास वीज कमी दरात मिळते. विक्रीकरिता शासन मदत करते. मात्र शासन शेतकऱ्यांकडे डोळेझाक करीत आहे. धानाला भाव नाही, १८ तास वीज नाही, मार्केटिंग नाही, खताच्या किंमतीवर नियंत्रण नाही. अशा एक ना अनेक चुकीच्या धोरणाने शेतकरी पुरता हतबल आहे. शेतातील पऱ्हे सुकत आहेत. सिंचनाकरिता वीज नियमित नाही. अधिकारी सत्ताधारी पुढे येऊन बोलायला तयार नाही. वरुण राजा बेपत्ता झाल्याने बळीराजा आकाशाकडे टक लावून बघत असून पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे. पऱ्हे करपू लागल्याने तालुक्यातील बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची दाट शक्यता आहे. आधीच रब्बीचे धान कवडीमोल भावाने विकावे लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यामुळे कुटूंबाचे पालन-पोषण, मुला-बाळांचे शिक्षण, मुलामुलींचे लग्न, बँक, सोसायटी, बचत गटाचे कर्ज कसे फेडावे, असे एक ना अनेक प्रश्न आवासून शेतकऱ्यांपुढे आहेत. शेतकऱ्यांना नेहमी अस्मानी व सुलतानी संकटाचा करावा लागत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला सापडल्याचे दिसून येते.दिवसाला शेतीकरिता १० तास वीज मिळत असताना अचानक मऱ्हेगाव फिडरला रात्रीचे वेळपत्रक देऊन शेतकऱ्यांचा मानसिक त्रास वाढविला आहे. रात्री १२ ते दिवसा १० पर्यंत वीज मिळणार असल्याचे वीज कार्यालयाकडून सांगण्यात आले. अख्खा दिवस शेतकरी शेतावर विजेची वाट पहात होते. पूर्वसूचना न दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.पालांदूर परिसरात चुलबंधच्या खोऱ्यात मुबलक भुजलसाठा असल्याने कृत्रिम सिंचनव्यवस्था बऱ्याच प्रमाणात आहे. मृगात पऱ्हे भरणी आटोपल्याने आता रोवणी जोमात असताना, अचानक दिवसाला वीज आलीच नाही. आता येईल, थोडा वेळाने येईल ,म्हणता म्हणता दुपार झाली तरी वीज नसल्याने शेतकरी संतप्त झाले. चौकशीअंती कळले की, परळी वीज केंद्र बंद पडल्याने विजेचा तुटवडा निर्माण झाला. पालांदूर उपकेंद्रात क्षमतेपेक्षा जास्त भार होत असल्याने संपूर्ण उपकेंद्रच बंद पडतो. मागणी अधिक व पुरवठा कमी होत असल्याने वीज समस्या नेहमीचीच झाली आहे. यावर उपाय म्हणून मऱ्हेगावात रात्रीदरम्यान विजपुरवठा खंडीत होत असल्याचे कळले. समस्या निकाली काढण्यासाठी उर्जामंत्र्यांशी चर्चा करुन उपाय होऊ शकतो. मात्र, राजकीय इच्छाशक्ती नसल्याने पालांदूर परिसर विजेच्या समस्येत जगत आहे. खासगीकरणामुळे विजसेवा दुरापस्त झाली. कंत्राटपद्धतीमुळे नफेखोरी बळावली आहे. चांगल्या दर्जाचे साहित्य वीज उपकेंद्राला मिळत नाही. दुरुस्तीकरिता वेळेत कर्मचारी मिळत नाही. यासह अनेक समस्यांनी पालांदूर विद्युत उपकरण केंद्र ग्रस्त आहे. अशा अनेक समस्या आवासून उभ्या असताना दिवसाचे भारनियम सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. (तालुका प्रतिनिधी)
भारनियमनामुळे शेतकरी अडचणीत
By admin | Updated: July 16, 2015 01:01 IST