देवानंद नंदेश्वर भंडाराजिल्हास्थळ असलेल्या भंडारा शहरात वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. याची जाणीव जिल्हा प्रशासनासह, नगरपालिका, शहरवासियांना असली तरी त्यांना याचे काही सोयरसुतक वाटत नाही. जिल्हा प्रशासन, शहर वाहतूक नियंत्रण शाखा व नगरपालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने शहरात वाहतूक नियंत्रक दिव्यांची वाणवा आहे. परिणामी अनेकांना जीव मुठीत घेऊन मार्ग ओलांडावा लागतो.भंडारा शहराची लोकसंख्या जवळपास दीड लक्ष एवढी आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासन लाखो रुपये खर्चून विविध उपाययोजना राबवित असते. आठ वर्षांपुर्वी शहरात प्रायोगिक स्तरावर शहरातील जिल्हा परिषद चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आली होती. अनेकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती नसल्यामुळे नियमाचे उल्लंघन नित्याची बाब ठरत आहे. काही दिवसातच वाहतूक नियंत्रक दिव्यात तांत्रिक बिघाड आला. दिव्याच्या नादुरुस्तीला नगर पालिका जबाबदार आहे. पालिकेने त्याचे देयक भरले नसल्याची माहिती आहे. आजही वाहतूक नियंत्रक दिव्याची फाईल बंद आहे.शहरातील महात्मा गांधी चौक, खांब तलाव चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, नागपूर नाका चौक या प्रमुख चौकांसोबतच जिल्हा परिषद चौक, मिस्कीन टँक चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, शीतला माता मंदिर चौक, पोस्ट आॅफिस चौक, बसस्थानक चौक येथे वाहनांची नेहमी वर्दळ असते. शहरातील प्रमख चौकात वाहतूक पोलिस तैनात असतात. वाहनांचे वाढते प्रमाण, अतिक्रमणाचा विळखा, अरुंद रस्ते आदी विविध कारणांमुळे दिवसातून अनेकदा वाहतूक सेवा ठप्प होत असते. याचा रुग्णवाहिकालाही फटका बसतो. शहरातून राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. आठवडी बाजाराच्या दिवशी गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, पोष्ट आॅफिस चौकात वाहतुकीची कोंडी होत असते.
शहरात वाहतूक नियंत्रक दिव्यांची वाणवा
By admin | Updated: January 10, 2015 00:29 IST