गुलाबी थंडीत फुलू लागली भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:54 AM2017-12-26T10:54:00+5:302017-12-26T10:54:26+5:30

भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील निसर्गरम्य, मनमोहक पर्यटनस्थळाला पर्यटक रोज मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.

Tourist places in Bhandara district attracts tourists | गुलाबी थंडीत फुलू लागली भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

गुलाबी थंडीत फुलू लागली भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Next
ठळक मुद्देऐतिहासिक वारसा व वन्य प्राण्यांच्या दर्शनासाठी गर्दी

आॅनलाईन लोकमत
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील निसर्गरम्य, मनमोहक पर्यटनस्थळाला पर्यटक रोज मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.
भेट देत असलेल्या पर्यटनस्थळात विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण, रुयाड येथील पञ्ञा मेत्ता आंतरराष्ट्रीय स्तराचा महासमाधीभूमी महास्तूप, पवनीतील ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायक यापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर व उमरेड कºहांडला, पवनी वन्यजीव अभयारण्य आदी पर्यटनस्थळाचा समावेश आहे.
पवनीपासून १२ किलोमिटर अंतरावर विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटते. धरणाच्या ३३ भव्य वक्रद्वारांनी धरणाला भव्य बनवले आहे. हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत.
पवनी पासून ३ किलोमिटर अंतरावरील रुयाड (सिंदपुरी) येथील पञ्ञा मेत्ता संघ द्वारा निर्मित महासमाधीभूमी महास्तूप भारताच्या स्थापत्त्य क्षेत्रात नाविण्यपूर्ण ठरला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तराच्या महास्तुपाच्या निर्मितीमुळे देश विदेशामध्ये भंडारा जिल्हा जगाच्या नकाशावर आला आहे. शांतीचा संदेश देणारा हा महास्तूप भारत जपानच्या मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महाखुण मधील सम्यक संबुद्धाची ४० फुट उंच मूर्ती भव्य शांत सभागृहात मनाला शांती देते.
पवनी हे ऐतिहासिक व प्राचीन शहर आहे. पवन राजाने या शहराला वसविले. ही त्यांची राजधानी होती. प्राचीन काळात पवनी अत्यंत वैभवशाली शहर म्हणून प्रसिद्ध होते. मौर्य, वाकाटक, शृंग, सातवाहन, यादव काळात हे शहर प्रगत होते. या शहरावर यादव, गोंड, भोसले राजांनी राज्य केले. यादवानंतर चंद्रपूरच्या गोंड राजाने पवनी येथील डोंगरावर १५ व्या शतकात किल्ला बांधला. शहराच्या तीन बाजूला टेकड्यांवर तीन मैल किल्ला बांधला. नंतर १७ व्या शतकात भोसल्यांचे राज्य आले. परकोट सदृष्य किल्ल्यामधून बंंदूका, तोफामधून गोळ्या मारण्याचे छिद्रे आहेत.
हा किल्ला ऐतिहासिकतेची साक्ष देत आजही उभा आहे. पूर्व विदर्भाची काशी व मंदिराचे शहर म्हणून ओयखल्या जाणाऱ्या पवनीमध्ये विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या मंदिरातील पंचमुखी गणेशाची प्रतिमा ही १० व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. एका शिळास्तंभावर चारही बाजूला गणेशाची प्रतीमा कोरली आहे. पाचवी प्रतीमा नैऋत्य दिशेला कोरली आहे. शिळास्तंभाचा वरचा भाग ११ इंच गोलाकार आहे. ही प्रतिमा आकर्षक आहे. पर्यटक या मंदिरासोबतच टेंभ्येस्वामी मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, रांझी चा गणपती आदी मंदिरांनाही भेट देत आहेत. उमरेड कऱ्हाडला पवनी वन्यजीव अभयारण्यातील जंगल घनदाट व विस्तीर्ण आहे. या जंगलात वाघ, बिबटे, हरिण, सांबर, चितळ, निलगाय व अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत. येथे मोठ्या संख्येत असलेले वाघ पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

Web Title: Tourist places in Bhandara district attracts tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन