भंडारा : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये याकरिता महावितरणने सर्व संक्र ांतप्रेमींना पतंग उडविताना साविधगरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.पतंग उडविण्याचा मोह लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो. हा मोह त्यांना टाळता येत नाही. परंतु शहरी भागात वीज वितरणाच्या लघु आणि उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेली पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकते. अशावेळी काहीजण ती अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असते. त्यामुळे अडकलेली पतंग काढण्याचा हा प्रयत्न जीवावर बेतू शकतो. यामुळे अशी अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. बरेचदा अडकलेल्या पतंगीचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भीषण अपघात होण्याची शक्यता असते. मांजा ओढताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होऊन शॉर्टसर्कीट होण्याची, अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडू शकतो. संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून या उत्सवाला गालबोट लागू नये, याकरिता पतंग उडविताना पुरेपूर सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. (शहर प्रतिनिधी)
पतंग उडवा पण.. जरा जपून
By admin | Updated: January 10, 2015 00:26 IST