वरठी : सिमेंटचे रस्ते व नाल्या आणि समाज मंदिराचे बांधकाम म्हणजे क्षेत्राचा विकास आराखडा पुर्ण होत नाही. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजू कारेमोरे होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, सेवक कारेमोरे, सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलिंद रामटेके, पंचायत समिती सदस्य रवी येळणे उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्हा नवोदय विद्यालयापासून वंचित आहे. १५ वर्षापूर्वी नवोदय विद्यालय मंजूर झाले. त्यासाठी मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथील शासकीय भुखंडाची निवड करण्यात आली. यासाठी सर्व स्तरावरची कारवाई पुर्ण झाली असून नवोदय विद्यालयाच्या भुखंडावर असलेले अतिक्रमन काढून जागा मोकळी करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात आरोग्य सेवेची दुरावस्था आहे. ग्रामीण रुग्णालय असूनही संपुर्ण भार जिल्हा रुग्णालयावर पडत होता. यामुळे सर्व प्रथम तुमसर येथील ग्रामीण रुग्णालयात सोयी सुविधांचा आढावा घेऊन कमतरता दूर करण्यात आली. याचा परिणाम आरोग्यसेवा सुरळीत होण्यासाठी मदत झाली. लवकरच मोहाडी व तुमसर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राकडे लक्ष केंद्रीत करुन आवश्यक सुधारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोहाडी तालुक्यातील शैक्षणिक व्यवस्थेत सुधारण्याकरिता आमदार म्हणून कांद्री येथील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेतली आहे. ही शाळा जिल्हयात मॉडेल शाळा म्हणून उभी करण्याचा प्रयत्न आहे. निकृष्ट दर्जाचे पोषण आहार पुरवठा करणाऱ्या संस्थांवर देखरेख समिती नेमण्यात येणार आहे. (वार्ताहर)
शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा
By admin | Updated: January 10, 2015 00:30 IST