पीक नुकसान 'निरंक'चा जावई शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 06:00 AM2019-11-16T06:00:00+5:302019-11-16T06:00:44+5:30
अधिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ओला झालेला धान सुकविण्यासाठी घरी आणला. पंचनाम्याच्या वेळी शेतात कापलेला धान नसल्याने अधिकाऱ्यांनी नुकसान निरंक असल्याच्या शेरा दिला. मात्र अनेक शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजल्याने ‘पाखर’ झाला आहे. पाखर धानाला भाव मिळत नाही व त्याला शासन किंवा व्यापारी सुद्धा खरेदी करीत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
सिराज शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यात परतीच्या पावसाने अनेक शेतकºयांच्या धान पिकाचे नुकसान झाले असून शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने मोहाडी तालुक्यात धान पिकाचे नुकसान निरंक असल्याचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात आला आहे. तर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचा अर्ज त्यांच्याकडे केला असून पिक विमा मिळण्याची मागणी केली आहे. परंतु या जावई शोधाने आता शासनाची मदत मिळण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा भंग झालेली आहे.
मोहाडी तालुक्यात २८ हजार ६६४ हेक्टरवर सर्वसाधारण धान रोवणी करण्यात आली होती. ५१ हेक्टरवर आवत्या पद्धतीने धान लागवड करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी सुरुवातीपासूनच झालेल्या पावसामुळे १०० टक्के भात रोवणी पुर्ण झाली होती. हलक्या धानाची कापणी सुरू असतानाच परतीच्या पावसाने कहर केला. कापलेला धान शेतात ठेवला असतानाच शेतात पावसाचे पाणी जमा झाल्याने काही शेतकऱ्यांचे धान ओले झाले. अधिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ओला झालेला धान सुकविण्यासाठी घरी आणला. पंचनाम्याच्या वेळी शेतात कापलेला धान नसल्याने अधिकाऱ्यांनी नुकसान निरंक असल्याच्या शेरा दिला. मात्र अनेक शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजल्याने ‘पाखर’ झाला आहे. पाखर धानाला भाव मिळत नाही व त्याला शासन किंवा व्यापारी सुद्धा खरेदी करीत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. काही शिक्षित शेतकऱ्यांनी लगेच कृषी व महसूल विभागात अर्ज करून पीक विम्याची मागणी केली असता त्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे व फोटो काढून संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात आले आहे. मात्र या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभ मिळेल की नाही हे येणारा काळच सांगू शकतो. परतीच्या पावसाने या भागाला झोडपून काढल्यावरही कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी नुकसानच झाले नाही असे सांगत आहेत. कृषी विभागाचे कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी टेबलवर बसूनच पंचनामे केले असल्याची शेतकºयांची ओरड आहे. नुकसान निरंक पाठविण्यात आल्याने शेतकरी दुखावला आहे.
कृषी व महसूलचे कार्यालयात बसून पंचनामे
कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व महसूल विभागातील तलाठ्यांनी मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर कार्यालयात बसूनच संपूर्ण तालुक्यातील पंचनामे पूर्ण केले अशी तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. निवडणुकीची धामधूम व त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या असताना सुद्धा मोहाडी तालुक्यातील कृषी विभागातील कर्तव्यनिष्ठ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यातील पंचनामे लगेच पूर्ण केले व वरिष्ठांची शाब्बासकी मिळविली, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे येथील संपूर्ण शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित झालेले आहेत. नुकसान होऊनही अहवाल निरंक दाखविणे म्हणजे शेतकºयांची थट्टाच नाही काय?