भंडारा : शहरातील विविध प्रभागातील समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांच्या नेतृत्वात सोमवारला दुपारी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. शहरातील नागरिकांना अतिक्रमण, दूषित पाणी पुरवठा, कचरा निर्मुलण व अस्वच्छता या नानाविध समस्यांना तोंड दयावे लागत आहे. याबाबत पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. पंरतु पालिका प्रशासनाने यावर प्रभावी उपाययोजना केली नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून समस्या अवगत करण्यात आल्या. प्रभाग क्रमांक ५ मधील मैदामील मागील वसाहतीत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्याची डागडुजी करण्यात यावी, शहरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, खांबतलाव परिसरातील वस्ती, सांडपाण्याची व्यवस्था, दूषित पाणी, कचरा व्यवस्थापन, घंटागाडीची नियमितता, रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची व्यवस्था, डास व्यवस्थापन, बगीच्यांचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी महेंद्र निंबार्ते यांनी केली आहे. यावेळी नगराध्यक्ष बाबुराव बागडे, नगरसेवक शमीम शेख उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By admin | Updated: March 1, 2016 00:25 IST