सिंचनाअभावी शेती धोक्यात : पावसाच्या पाण्यावरच अवलंबूनपहेला : भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील सात गावांना अद्यापही जलसिंचनाची कोणतीच सुविधा नसल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यात गोलेवाडी, डोंगरगाव, भिकारमिन्सी, पन्नाशी, एटेवाई, सोनेगाव आणि पागोरा या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.दिवसेंदिवस पावसाचे पाणी कमी पडत असल्याने या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील शेतीला अस्मानी तद्वतच सुलतानी संकटालाही सामोरे जावे लागते व तेथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. रावणवाडी जलाशयाचे पाणी या गावापर्यंत गेल्यास त्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होवू शकते. यापूर्वी रावणवाडी जलाशयाचे पाणी इटगाव, वडद, निमगाव, जामगाव मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला, बोरगावखुर्द, रावणवाडी, वाकेश्वर इत्यादी गवाना पुरविण्यात येत होते. परंतु आता टेकेपार उपसा सिंचन योजना सुरू झाल्याने रावणवाडी जलाशयाशी जोडलेले असलेले इटगाव, वडद, निमगाव, जामगाव, मौदी, नवरगाव, चोवा, उसरीपार, श्रीनगर, पहेला ही १० गावे आता टेकेपार उपसा सिंचन येथे जोडलेले असल्याने आता रावणवाडी जलाशयाचे पाणी फक्त बोरगाव खुर्द, रावणवाडी आणि वाकेश्वर या तीनच गावांना मिळत आहे व बरेचशे पाणी तलावात शिल्लक राहते. शिल्लक राहिलेले पाणी जवळच्या सोनेगाव, गोलेवाडी, पन्नाशी, डोंगरगाव, पागोरा, एटेवाई, भिकारमिन्सी इत्यादी गावाना मिळू शकते. त्याकरिता रावणवाडी जलाशयापासून ते सोनेगाव, एटेवाई, गोलेवाडी, डोंगरगाव ते पागोरा पर्यंत नवीन नहर काढल्यास त्या सात गावातील शेतकऱ्यांना पाण्याची सोय होऊ शकते. मात्र या नवीन प्रस्तावाकडे या क्षेत्राचे आमदार, अधिकारी यांनी दुरदृष्टी ठेवून बघितले तर नक्कीच हे काम तेवढे कठीण नाही. परंतु या प्रस्तावाकडे सर्वांचिच उदासिनता दिसून येत असल्याचे चित्र आहे आणि म्हणून या सातही गावातील नागरिक शासनाच्या प्रति आपला रोष व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणे रावणवाडी जलाशयाचे पाणी कमी पडल्यास टेकेपार उपसा सिंचनाचे पाणी भिलेवाडा येथपर्यंत गेले आहे. समोर तोच वाढवून वाघबोडी मार्गे नवीन नहर काढून ते नहर सरळ रावणवाडी जलाशयापर्यंत येऊ शकते व त्या नहराने टेकेपार उपसा सिंचनाचे पाणी सरळ रावणवाडी जलाशयात पाडता येते. एकदाचे का पाणी रावणवाडी जलाशयात पडले तर त्या जलाशयापासून सोनेगाव, एटेवाई, गोलेवाडी या गावापासून नवीन नहर काढून ते पाणी त्या सातही गावातील शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. (वार्ताहर)
‘ती’ सात गावे सिंचनापासून वंचित
By admin | Updated: June 12, 2014 23:48 IST