लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : सामाईक शेतजमिनीचे विक्रीपत्र करताना सर्व शेतकरी विक्रीपत्राच्या वेळी हजर असणे आवश्यक आहे. असे असताना तीनपैकी एका शेतकऱ्याने विक्रीपत्र करून देण्याचा प्रकार पवनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाला. यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असून दुय्यम निबंधक व इतर यामध्ये दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी आहे.
पवनी तालुक्यातील भुयार येथील खाते क्रमांक १०३०६ गट नंबर ५७४ वर ४.४१ हे. आर. शेतजमीन नवनाथ तुळशीराम अलोने, देवीदास बळीराम अलोने, रामदास बळीराम अलोने यांची नावे ७/१२ वर आहे. या जमिनीचे खरेदी विक्री दुय्यम निबंधक कार्यालय पवनी येथे २७ मार्च २०२५ करण्यात आले. त्यामध्ये विक्री पत्रात ४.४१ हे.आर. पैकी १.४७ हे. आर. शेतजमीन रामदास बळीराम अलोने यांनी विद्या रामू सोनवणे, विशाल पंढरी सिंदूरकर यांना १५ लाख रुपये यामध्ये विक्रीपत्र करून दिले. विक्रीपत्र करताना नवनाथ तुळशीराम अलोणे व देवीदास बळीराम अलोणे यांची कोणत्याही प्रकारची सहमती दस्तावेजामध्ये घेतली नाही.
नवनाथ अलोणे व देवीदास अलोणे यांच्या लक्षात आल्यानंतर तलाठी भुयार यांना पत्र देऊन जमिनीचा फेरफार रोखण्याची मागणी केली. परंतु त्यांनीही फेरफार रोखले नाही. आपल्याला न्याय मिळणार नाही आपली परवानगी न करता या जमिनीचे विक्रीपत्र दुय्यम निबंध कार्यालयातर्फे करण्यात आले. असे प्रकार दुय्यम निबंधक पवनी कार्यालयातर्फे अनेकदा झालेले आहे.
यापूर्वी कोंढा येथील एका विक्रीपत्रात सामाईक क्षेत्र असलेल्या शेतजमिनीची विक्रीपत्र केले असल्याचे समजते. यामध्ये गैरव्यवहार केला असल्याचे समजते. शेतजमिनीचे झालेले विक्रीपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी नवनाथ तुळशीराम अलोणे व देवीदास बळीराम अलोणे यांनी वरिष्ठांकडे केलेल्या लेखी तक्रारीत नमूद आहे.
येथे आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे विक्रीपत्र, बोजापत्र, हक्कसोड दस्ताऐवज नोंदणी केले जात नाही. दुय्यम निबंधक व येथील दलालांना मोठी रक्कम दिल्यानंतर अनेक प्रकारचे दोषपूर्ण खरेदी-विक्री केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
"दुय्यम निबंधक कार्यालय पवनी तर्फे खोटे दस्तऐवज केले जात नाही. माझ्याकडे दस्ताऐवज घेऊन कार्यालयात यावे. नंतर त्याची सविस्तर माहिती देईन."- प्रविण तोवर, दुय्यम निबंधक श्रेणी १, पवनी